वनसंवर्धन दिन विशेष; वृक्षांचे जिओ टॅगिंग करण्याची कामगिरी पालिकेकडून पूर्ण
संदीप राक्षे
सातारा – शहर आणि परिसर वनाने समृद्ध असल्याची खात्री खुद्द सातारा पालिकेने दिली आहे. शहर आणि परिसरात तब्बल पाच लाख 74 हजार 282 वृक्ष असून त्यांचे जिओ टॅगिंग पूर्ण करण्याची कामगिरी वृक्ष विभागाने पार पाडली आहे. त्यामुळे शनिवारी वनसंवर्धन दिवस साजरा होत असताना सातारा पालिकेच्या खात्यावर वेगळा उपक्रम राबवल्याची नोंद झाली आहे.
जागतिक तापमानवाढ, प्रदूषण आणि अवर्षणाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे 1992 मध्ये ब्राझीलमध्ये भरलेल्या पहिल्या जागतिक वसुंधरा परिषदेमध्ये वृक्षसंवर्धन आणि एकूण क्षेत्राच्या 33 टक्के वनाच्छादन राखण्याविषयीचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हापासून 23 जुलै हा दिवस वन संवर्धन दिन राबवला जातो. या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेने शहरातील पाच लाख 74 हजार वृक्षांचे जिओ टॅगिंग पूर्ण केले असून शहरामध्ये तब्बल 50 जात कुळीचे वृक्ष एका सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाले आहेत.
साग, सुबाभूळ, सुपारी, नारळ, आंबा, काटेसावर, बोर, सुरू, सोनचाफा, शेवगा, उंबर, गिरीपुष्पा, सीताफळ, ताडदेव, बाभूळ, खैर, चिकू, कडूलिंब, पिंपळ, जंगली बदाम, गुलमोहर, पारिजातक, बोर, रामफळ यांसह जातकुळी वृक्षाच्या विविध नोंदी घेण्यात आल्या आहेत. या नोंदी सातारा पालिकेने एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने पूर्ण केल्या आहेत. वृक्ष विभागाचे विभाग प्रमुख प्रणव पवार यांच्या देखरेखी खाली हे जिओ टॅगिंग नुकतेच पूर्ण करण्यात आले. या गणनेदरम्यान शासकीय कार्यालये, निवासस्थाने, खासगी औद्योगिक क्षेत्र, खासगी मालमत्ता, बागा, खुल्या जागा येथील वृक्षांची गणना करण्यात आली.
सातारा शहराची हद्दवाढ झाल्यामुळे हद्दवाढीनंतर शाहूपुरी, विलासपूर, दरे खुर्द, अजिंक्यतारा किल्ल्यासह ते उंटाच्या डोंगराच्या नजीक गेलेल्या जगतापवाडीपर्यंतचा भाग हा पालिकेत आला आहे. मूळ शहरासह विस्तारित भागातील वृक्षाच्या नोंदी घेण्याचीसुद्धा मोहीम मागील आठवड्यामध्ये राबवण्यात आली होती. या नोंदीवरून सातारा शहराची भौगोलिकता वेगवेगळ्या वृक्षसंपदेने समृद्ध आहे हे स्पष्ट झाले आहे. एकूण जमीन क्षेत्राच्या 33 टक्के वनाच्छादन असावे असा एक वनविभागाचा संकेत आहे, तो निकष सातारा शहर निश्चितच पूर्ण करते, अशी माहिती पालिकेच्या वृक्ष विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
“”जिओ टॅगिंगच्या माध्यमातून संबंधित झाडाचे वय आणि त्याचे आयुर्मान या माहितीची शास्त्रीय नोंद येणे शक्य होते. या सर्व वृक्षांची शास्त्रीय नोंद पालिकेच्या दप्तरी प्रमाणित करण्यात आली आहे. शहराच्या परिसरात असणारी निसर्गसंपदा नक्की काय आहे, शहराची भौगोलिकता आहे, या अधिवासात रुजणारे कोणते वृक्ष आहेत याची इत्यंभूत माहिती उपलब्ध होते. त्यामुळे पुढील काळात वृक्षारोपण करतानासुद्धा कोणत्या वृक्षाची लागवड करावी याची निश्चित दिशा मिळते. जिओ टॅगिंगमुळे वृक्षाची उंची, घेर, वयोमान आणि त्याला पडणारे रोग याची नोंद घेणे आणि त्यावर उपाययोजना करणे शक्य होते.
– अभिजित बापट
(मुख्याधिकारी, सातारा नगरपालिका)