नवी दिल्ली – महाराष्ट्र, हरियाणा, तेलंगणा, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या पाच राज्यांनी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एमएम कुमार यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे संपर्क साधला असला तरीही त्यांना महासंघाच्या निवडणूकीत मतदानाचा हक्क नाकारण्यात आला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) कुस्ती महासंघ निवडणुकीच्या तारखा बदलत येत्या 11 जुलैला निवडणूका घेण्याचे जाहीर केले आहे. याआधी या निवडणुका 6 जुलैला होणार होत्या. आयओएच्या समितीने पाच अवैध राज्य घटकांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
या निवडणुकीचा निकालही 11 जुलैलाच जाहीर होणार आहे. कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत देशातील प्रसिद्ध कुस्तीपटूंनी निदर्शने केली होती. यादरम्यान दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटू धरणे धरत बसले होते. ब्रिजभूषण यांच्यवर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. ज्यासाठी दिल्ली पोलिसांनी दोन एफआयआर नोंदवले होते.
गेल्या आठवड्यात पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्रही दाखल केले होते. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर खेळाडूंनी आंदोलन स्थगित केले. 15 जूनपर्यंत ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याचे खेळाडूंवर दाखल करण्यात
आलेला एफआयआर मागे घेण्याचे आणि कुस्ती संघटनेच्या निवडणुका लवकरच घेण्याचे आश्वासन सरकारने खेळाडूंना दिले होते. आता पोलीस तपास पूर्ण होत आलेला असून त्याच्या अहवालात काय समोर येते यावर कुस्तीपटू पुढील निर्णय घेणार आहेत.
हंगामी समितीच्या निर्णयावर टीका
आंदोलनात सक्रीय असलेल्या विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, संगीता फोगट, सत्यवर्त कडियन आणि जितेंदर किन्हा या कुस्तीपटूंना केवळ एका सामन्यातील विजयाच्या आधारे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड केली जाणार असल्याचा निर्णय कुस्ती महासंघावर असलेल्या हंगामी समितीने घेतला.
मात्र, अन्य कुस्तीपटूंनी या निर्णयावर टीका केली आहे. आंदलोन करुन वेठीस धरलेल्यांना सवलत दिली जाते व आम्हाला पूर्ण निकष पार करावे लागणार असा निर्णय हंगामी समिती कसा काय घेऊ शकते, असा सवाल अन्य कुस्तीपटूंनी केला आहे.
आंदोलक कुस्तीपटूंना निवड चाचण्यांमधील विजेत्यांविरुद्ध खेळण्याची संधी येत्या 5 ते 15 ऑगस्ट या कालावधीत मिळणार असून या एका लढतीत विजय मिळवल्यास त्यांचे भारतीय संघातील स्थान निश्चित होणार आहे.