पुणे – डोळे येण्याच्या साथीत राज्यात साडेपाच लाख जणांना संसर्ग झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. यामध्ये पुणे जिल्हा अव्वल असून, 52 हजार रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात डोळे येण्याची साथ ओसरली आहे. यामध्ये पुण्यापाठोपाठ बुलढाणा – 50 हजार, जळगाव – 29 हजार, चंद्रपूर – 27 हजार आणि अमरावती – 23 हजार असे पाच जिल्हे “टॉप फाइव्ह’ मध्ये आहेत. तर राज्यात सर्वांत कमी 59 इतकी रुग्णसंख्या उल्हासनगर मनपा हद्दीत आढळून आली आहे.
जुलैमध्ये पुण्यातूनच या साथीची सुरूवात झाली. आळंदी येथे डोळे आलेले रुग्ण दिसून आले. पुढे ही साथ जिल्ह्यात पसरली. त्यानंतर याच साथीने राज्यभर थैमान मांडले. आता सर्वच जिल्ह्यात, महापालिकांच्या क्षेत्रात या साथीचे रुग्ण आढळून आले आहेत. आता त्यापैकी जवळपास सर्वच रुग्ण बरे झाले आहेत.
काळजी घेणे आवश्यक
डोळे येणे मुख्यत्वे डीनो व्हायरस मुळे होते. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्यांना सूज येणे अशी लक्षणे आढळतात. हा आजार होऊ नये म्हणून वैयक्तिक स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये वारंवार हात धुणे, डोळ्यांना हात न लावणे इ. गोष्टींचा समावेश आहे.