महाविद्यालयाकडून निष्क्रीयतेचा विद्यार्थ्यांचा आरोप
नवी दिल्ली : गार्गी महाविद्यालय या मुलींच्या महाविद्यालयामध्ये काही गुंडांनी धुडगूस घातल्याच्या चार दिवसांनंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी “एफआयआर’दाखल केली. मुलींच्या महाविद्यालयामध्ये घुसलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.
गार्गी महाविद्यालयात 6 फेब्रुवारीला “रिव्हरी’ फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. त्या महोत्सवामध्ये अन्य महाविद्यालयांमधील विद्यार्थीही सहभागी झाल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात झालेल्या वादंगामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली. काही अनोळखी युवकांनी या महिला महाविद्यालयामध्ये धुडगुस घातला.
विद्यार्थिनींची छेड काढली आणि मालमत्तेची मोडतोडही केली होती. या प्रकाराबद्दल काही राजकीय पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि या घटनेचे पडसाद संसदेमध्येही उमटले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. तर मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल “निशंक’ यांनी या प्रकरणातील दोषींवर महाविद्यालयाने कडक कारवाई करण्याची सूचना आपण केल्याचे सांगितले.
दोषींना त्वरित अटक केली जावी, अशी मागणी भाजप आणि कॉंग्रेसच्या दिल्लीतील पदाधिकाऱ्यांनी सामूहिकपणे केली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनीही या घटनेची दखल घेतली आणि महाविद्यालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणी निष्क्रीय असल्याचा आरोप महाविद्यालय प्रशासनाने नाकारला आहे. विद्यार्थ्यांबरोबर सर्वसाधारण बैठक घेऊन सामोपचाराने हे प्रकरण सोडवले गेल्याचे प्राचार्या प्रोमिला कुमार यांनी सांगितले.
कॉलेजमध्ये घुसलेले तिशीतील युवक मद्यधुंत अवस्थेत होते. त्यांनी विद्यार्थिनींबरोबर असभ्य वर्तन केले. त्यावेळी सुरक्ष रक्षक आणि दिल्ली पोलीस कर्मचारी मूकदर्शक बनले होते, असा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला. काही जण गेटवरून उड्या मारून तर काही जण भिंती ओलांडून आवारात घुसले होते. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी मुली स्वच्छतागृहात शिरल्या आणि त्यांनी स्वतःला कोंडून घेतले होते.
काही विद्यार्थ्यांबरोबर घुसखोरांची बाचाबाची झाली आणि घुसखोरांनी त्यांना शिवीगाळही केली. या प्रकाराकडे सुरक्षा रक्षकांनी पूर्ण डोळेझाक केली. महाविद्यालयानेही या प्रकरणची दखल घेण्यास नकार दिला होता, असेही काही विद्यार्थी म्हणाले.
दुसऱ्या दिवशीही कॉलेजने कोणतीही कारवाई करण्याचे आश्वासन दिले नाही. त्यामुळे या घटनेची माहिती इन्स्टाग्रामवर शेअर केली गेली. या घटनेसंदर्भात कडक कलमांखाली “एफआयआर’दाखल केली गेल्याचे दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्त अतुल कुमार ठाकूर यांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास महिला विभागाच्या निरीक्षकांकडून केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. पोलीस सीसीटिव्हीचे चित्रीकरण तपासत आहेत. कॉंग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. या गुंडगिरीमागे “सीएए’समर्थक कार्यकर्ते असल्याचा आरोप डाव्या गटांनी केला आहे.