मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ः आरोपीला कठोर शिक्षेसाठी सरकारचा प्रयत्न
मुंबई : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील तरूणीच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आरोपीला हा महाराष्ट्र अजिबात दयामाया दाखवणार नाही. ही हत्याच आहे, महाराष्ट्रात अशा घटनांना थारा नाही, असे स्पष्ट करतानाच या हत्येसाठी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार गप्प बसणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
एकतर्फी प्रेमातून प्राध्यापक तरूणीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला होता. महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या घटनेमुळे अवघ्या राज्यात संतापाची लाट उसळली होती. आठ दिवसांच्या शर्थीच्या उपचारानंतर अखेर या तरूणीचे सोमवारी निधन झाले. तिच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दुख: व्यक्त केले.
आरोपीला कोणतीही दयामाया दाखवणार नाही. थोडा धीर धरा, आरोपीला शिक्षा दिल्याशिवाय हे सरकार गप्प बसणार नाही. आरोपीला शिक्षा देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
या प्रकरणाचा तपास वेगाने आणि खटला जलद गतीने चालेल यावर कटाक्ष असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पीडीता, तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल यासाठी शासनाचे संबंधित विभाग समन्वयाने काम करतील. अशा घटनेत तपासात कुचाराई होऊ दिली जाणार नाही. खटला वेगाने आणि दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा रितीने चालविण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यपालांनीही व्यक्त केले दुःख
हिंगणघाट येथे जळीत प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या महिला अध्यापिकेच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ही दुर्दैवी घटना संपूर्ण समाजाला आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. आज मुली आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सर्वच क्षेत्रात प्रगती करीत आहेत. नवनवीन जबाबदाऱ्या व आव्हाने समर्थपणे सांभाळीत आहेत. महिलांचा सर्वंकष उत्कर्ष होण्यासाठी समाजाचा महिलांप्रती दृष्टीकोन अधिक सकारात्मक होणे आवश्यक आहे. या दु:खद प्रसंगी मी मुलीच्या आई-वडिलांना आपल्या तीव्र शोक संवेदना कळवितो, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.