नवी दिल्ली – देशातील पाच महत्त्वांच्या राज्यात विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार प्रचाराची एकही संधी हातातून जाऊ देत नसल्याचं चित्र आहे. अगदी संसदेतील भाषणात देखील मोदी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून टीका करत असल्याचं दिसून येत आहे. परंतु, आतापर्यंत मोदींच्या टीकेत पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरूंचा उल्लेख आला नव्हता. मात्र आज त्यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत नेहरूंवर नवीन आरोप लावला.
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्तीसंग्रामावर भाष्य केले. गोवा मुक्तीसंग्रामावेळी तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी गोव्यातील जनतेवर अन्याय केल्याची टीका मोदींनी केली.
‘सरदार पटेल यांच्याकडून प्रेरणा घेऊन गोव्यासाठी रणनीती तयार केली असती, तर भारताच्या स्वातंत्र्यानंतरही गोव्याला 15 वर्षे गुलामीत राहावे लागले नसते. नेहरूंना आपल्या प्रतिमेची काळजी होती आणि गोव्यात सत्याग्रहींवर गोळीबार होत असताना आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी मी सैन्य पाठवणार नाही असे सांगितले होते.
याआधी लोकसभेतील भाषणात मोदींनी काँग्रेस आणि महाराष्ट्राला करोना पसरविण्यासाठी जबाबदार धरलं होतं. महाराष्ट्रामुळेच उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तरखंडमध्ये करोना मोठ्या प्रमाणात पसरल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या तीनही राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. वास्तविक पाहता, करोना संसर्गाच्या लाटेच्या वेळी केंद्र सरकारने अनेक रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली होती. अर्थात ही व्यवस्था मजुरांना घरी जाण्यासाठीच केली होती.