सातारा – राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे 15 आमदार निवडून आणणार, असा दावा माजी पशुसंवर्धन मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आ. महादेव जानकर यांनी सातारा येथे केला.
रासपचा मेळावा साताऱ्यात बुधवारी झाला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. सातारा जिल्ह्यात फलटण व माण मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. या तालुक्यांमध्ये पक्षाची मोठी ताकद असल्याने आमचे आमदार निवडून येतील. शरद पवार यांचा पक्ष राज्यात किंगमेकर आहे, भविष्यात तीच भूमिका रासप बजावेल, असा दावाही त्यांनी केला. मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांचे आ. जानकर यांनी समर्थन केले. केंद्रीय कृषिमंत्री तोमर हे शेतकरी पुत्र आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांना माहिती आहे.
कॉंग्रेसने केलेले कृषी कायदे चुकीचे असल्याने देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्या. या आत्महत्या रोखण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी मोदी सरकारने कृषी कायदे केले आहेत. महायुती सरकारमध्ये मंत्री असताना मी गाय व म्हशीच्या दुधाला दर वाढवून दिला. आता सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारची नियत चांगली नाही. आम्ही सत्तेवर असतो तर गायीच्या दुधाला 65 व म्हशीच्या दुधाला 85 रुपये दर दिला असता, असे ते म्हणाले.