नवी दिल्ली – उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आक्रमकतेने प्रचार कऱण्यास सरसावले आहेत. काँग्रेसकडून प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात पक्षासाठी मैदान तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव राज्य पिंजून काढत आहेत. आता अखिलेश यादव यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी एअर इंडियाची नुकतीच झालेली विक्री आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधील खासगी गुंतवणूक यावरून अखिलेश यांनी मोदींवर खोचक टीका केली.
अखिलेश म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने सध्या देश विकायला काढला आहे. आधी मोदी सरकार फेकत होते, तेव्हा सर्वकाही ठीक होतं. मात्र आता हे सर्वकाही विकत असून हे ‘बेचू’ झाले आहे. समाजवादी पक्षाची विजयरथ यात्रा सुरू असून या विजयरथ यात्रेत अखिलेश बोलत होते.
दरम्यान सरकारने गरिबांचे खिसे कापून श्रीमंतांच्या तिजोऱ्या भरल्या. मात्र आगामी निवडणुकांनंतर समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशात सरकार स्थापन केले की, ते विद्यमान सरकारचे सर्व अतिरेक बंद करेल आणि समाजातील सर्व घटकांची समान काळजी घेईल, असेही अखिलेश यांनी सांगितलं