सासवड – पुरंदर-हवेतील सर्वसामान्य नागरीकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आणि गावच्या विकासाच्या संकल्पनांवर चर्चा करून त्या राबविण्यासाठी “शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या धर्तीवर पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या संकल्पनेतून “आमदार आपल्या दारी’ हा उपक्रम गुरुवार (दि. 17) पासून राबविण्यात येणार आहे. आठवड्यातील चार दिवस आणि एका दिवसात तीन गावे – वाड्यावस्त्यांवरील प्रत्येक घरापर्यंत पोहचून साधारण 66 दिवसांचे नियोजन करून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आमदार संजय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुरंदर तालुक्यातील 95 गावे आणि हवेलीतील 16 गावे आणि त्यांच्या वाड्या वस्त्यांवरील प्रत्येक घरापर्यंत जनसंपर्क आणि संवाद साधण्यात येणार आहे. याप्रसंगी शासनाच्या विविध 21 विभागातील अधिकारी, कर्मचारीही याप्रसंगी उपस्थित राहणार असून या माध्यमातून नागरिकांचे विविध प्रश्न, अडचणींची सोडवणूक करण्यात येणार आहे.
यामध्ये गुरुवार, शुक्रवार, शनिवारी पुरंदर तालुक्यातील गावे तर रविवारी हवेलीतील गावांत संपर्क साधण्यात येणार आहे. सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा संपर्क दौरा सुरू राहणार आहे. याबाबतचे वेळापत्रक दिले जाणार असल्याची माहिती नंदकुमार जगताप यांनी दिली. पत्रकार परिषदेला कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, नीरा बाजार समितीचे उपसभापती महादेव टिळेकर, उपस्थित होते.
दर सोमवार अधिकाऱ्यांबरोबर बैठक
या उपक्रमा नुसार संपर्क दौऱ्यात गावांत स्थानिक पातळीवरील समस्या सोडविण्यात येणार आहेत. तर तालुका पातळीवरील समस्या दर सोमवारी तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी आदी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेवून सोडविण्यात येतील. त्यामुळे सामान्य नागरीकांनी तालुक्याच्या ठिकाणी येण्याची गरज भासणार नाही. मंगळवारी पुणे मनपा हद्दीतील तसेच जिल्हा पातळीवरील समस्या सोडविण्यात येतील तर मुंबई येथे दर बुधवारी जाणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.
आरोग्यदूत नेमणार
प्रत्येक गावात आरोग्य दुताची नेमणूक करणार आहे. आजारी व्यक्तीला 5 लाख रुपयांपर्यंतच्या शासनाच्या मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीचा लाभ देण्याचे काम या आरोग्य दुतांच्या माध्यमातून करणार असल्याचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.