नवी दिल्ली: फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाने ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांत 3.51 लाख टनांचा धान्य पुरवठा केला आहे अशी माहिती अन्नमंत्रालयाच्यावतीने आज देण्यात आली. त्यातील 1.74 लाख टन धान्य प्रधानमंत्री गरीब अन्न योजना या योजनेमार्फत पुरवण्यात आले असून उर्वरीत अन्नधान्य अन्न सुरक्षा योजने अंतर्गत पुरवण्यात आले आहे.
प्रधानमंत्री गरीब अन्न योजने अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला पाच किलो मोफत तांदुळ आणि प्रति कुटुंब एक किलो डाळ पुरवली जात आहे. रेशनवर दिल्या जाणाऱ्या नियमीत धान्याच्या व्यतिरीक्त हा अन्नधान्य पुरवठा आहे असेही या मंत्रालयाने म्हटले आहे. देशात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाच्यावतीने ईशान्येकडील राज्यांच्या धान्य पुरवठ्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले कारण हा भाग बहुतांशी दुर्गम आहे. यापुढेही या भागाला सुरळीतपणे अन्नधान्य पुरवठा सुरूच राहणार आहे असेही या सरकारने म्हटले आहे.