जामखेड – मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील आंदोलन चांगलेच आक्रमक होत असतांना आता नगर जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी चौंडीत धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेतर्फे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा, त्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा यशवंत सेनेचे राज्यमंत्री व राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी दिला आहे.
त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारचीही डोकेदुखी वाढणार आहे. याशिवाय जालना जिल्ह्यात जशा राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या, तशाच चौंडीत धनगर आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणाच्या ठिकाणीही दिल्या जाणार आहेत. आमदार रोहित पवार उद्या येथे येऊन आंदोलकांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, बाळासाहेब दोडतले म्हणाले, धनगर आरक्षण मिळण्यासाठी भाजपच्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहे. या केंद्र सरकारने 370 वे कलम हटविले, राम मंदिराचा दीर्घकाळ रेंगाळलेला प्रश्न सोडविला, जे कधी सुटणार नाहीत असे वाटणारे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने सोडविले आहेत. राज्यातील सरकारमध्ये भाजपला सत्ते आणण्यासाठी धनगर बांधवाचा सिंहाचा वाटा आहे. देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यावेळी बारामतीमध्ये झालेल्या आंदोलनापुढे बोलताना फडणवीस म्हणाले होते की धनगर आरक्षणाचा माझा पूर्ण अभ्यास झालेला आहे. आमचे सरकार आले की पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रश्न मार्ग लावू. मात्र, फडणवीस यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला,आता दुसऱ्यांचा सत्ता मिळाली आहे. तरीही आमची मागणी मान्य झालेली नाही. आरक्षणाशिवाय धनगर समाजाच्या इतरही अनेक प्रश्न आहेत, तेही सोडविण्याची आमची मागणी आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी येथील स्मारकास्थळी बुधवारी सकाळापासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
प्रत्येक सरकार व राजकीय पक्ष धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे म्हणून जाहिर भूमिका घेतात. मात्र आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात काहीच कृती होत नाही. यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आता 18 ते 22 सप्टेंबरला संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण अंमलबजावणीचा वटहुकुम काढला जावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा करावा, या मागणीसाठी बी. के. कोकरे प्रणित यशवंत सेनेच्या वतीने हे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात अहिल्यादेवी होळकर यांचे मूळ वंशज अक्षय शिंदे पाटील, बाळासाहेब दोलतडे, माणिकराव दांगडे (बारामती), आण्णासाहेब रूपनवर, (माळशिरस), गोविंद नरवटे (लातूर), सुरेश बंडगर (परभणी), समाधान पाटील (जळगाव), नितीन धायगुडे (नातेपुते), किरण घालमे (इंदापूर), बाळा गायके (बीड), चौंडीचे सरपंच सुनील उबाळे, विलास जगदाळे, संतोष कुरडुले, अजित उबाळे, अजित शिंदे, अतिष शिंदे, अमोल उबाळे, गणेश उबाळे सहभागी झाले आहेत.