भोर – नगरपालिकेने शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी गुुरुवारी (दि. 18) केलेली अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा एकदा फार्सच ठरली आहे. दुखणं पोटाला अन इलाज पखालीला अशीच काहीशी अवस्था झाल्याची चर्चा भोरमध्ये रंगली आहे.
वाढती अतिक्रमणे आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नगरपालिकेने जानेवारी महिन्यात अतिक्रमणे जेसीबीच्या सहाय्याने हटवली होती. मात्र, अवघ्या आठच दिवसांत परिस्थिती जैसे थे झाल्याने नगरपालिकेने पुन्हा 30 मे रोजी कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, मुख्याधिकाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार पुणे येथे सोपवल्याने कारवाई स्थगित केली होती. त्यानंतर गुरुवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली. त्यामुळे शहरातील दुकानदारांच्या मनात धडकी भरली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात नगरपालिकेच्या कार्यालयासमोर असलेल्या नाना-नानी पार्कजवळील नव्याने उभारण्यात येणाऱ्या अग्निशमन बंबाच्या इमारती शेजारील जुनी आणि मोकळी असलेली कर्मचाऱ्यांची रिकामी घरे, रघुनाथ साळुंके यांचे राहते घर तसेच राजवाड्याच्या जीर्ण झालेल्या भिंतीला लागून असलेल्या अनधिकृत पाच-सहा टपऱ्या हटविण्यापलीकडे काहीच केले नाही.