नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास अजून वेळ असून आतापासूनच “इंडिया’ आघाडीतील जागा वाटपाची काळजी कशाला? असा सवाल नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे. तसेच जागावाटपाची घाई करून चालणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.मुंबईत “इंडिया’च्या दोन दिवसीय बैठकीसाठी फारुख अब्दुल्ला आज दाखल झाले आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली आहे.
फारुख अब्दुल्ला म्हणाले, जागा वाटपासंदर्भात आम्ही सर्वजण एकत्रित बसणार आणि विचार करणार आहे. देशाला आणि लोकशाहीला कसे वाचवू शकतो. देशात बंधुभाव कसा कायम ठेवू. देशात धर्माच्या नावाने हिंदू आणि मुस्लिमांना वेगळे करण्याचे राजकारण सुरू आहे. लोकांना कसे जोडायचे, कारण भारत आपल्या सर्वांचा आहे. आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशात सर्वजण एक आहोत. यासाठी आम्ही लढणार आहोत. आपण सर्व जण पाळू तेव्हा देश चालेल. देशाला वाचवण्यासाठी विचार करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
चीन प्रश्नावर फारुख अब्दुल्ला म्हणाले, भारताने चीनसोबत 18-19 वेळा चर्चा केली. त्याचा काही फायदा झाला का? चीन त्यांच्या जागेवरून हलला का?, आपण आपल्या ताकदीने उभे राहायचे आहे. आपण अमेरिका आणि रशियावर विश्वास ठेवायचा नाही.
आपण आपल्या शक्तीवर विश्वास ठेवायचा आहे. मग चायनाला जे कारायचे आहे, ते करू द्या. आम्हाला माहिती आहे, आमच्या देशाची सीमा कुठे आहे आणि आपल्या देशाच्या जवानांना सीमेच सरक्षण करता येते, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.