नांदेड – यावर्षी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थीनींनी पत्राद्वारे आपल्या वडिलांना एक हळवी साद घातली आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमधील इयत्ता चौथी ते दहावी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थींनीनी पुढील शिक्षणाच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी आई-वडिलांना विनंती करण्यासह वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याअगोदर आमचे बालविवाह करू नका, अशी आर्त हाक देणारी पत्रे लिहली आहेत. या अभिनव उपक्रमाची जोरदार चर्चा पाहायला मिळत असून, त्याचे सर्वदूर कौतुक होत आहे.
जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण रोखण्यासाठी शासनाने विविध कायद्यांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. तथापि जुन्या चालीरिती आणि कुप्रथा बाळगत अनेक पालक हे मुलींची वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याच्या आत त्यांचे बालपण आणि बालमन बालविवाह लावून कोमेजून टाकतात.
प्रत्येक आई-वडिलांच्या मनात आपल्या मुलीच्या हिताचा दृष्टिकोन जरी असला तरी त्यांना बालविवाह लावण्याच्या विचारापासून परावृत्त करण्यास मुलींची ही आर्त साद प्रत्येक “बाबा’ ऐकेल, असा विश्वास जिल्हाधिकारी राऊत यांनी व्यक्त केला आहे. राखी पौर्णिमेच्या निमित्ताने बालविवाह जनजागृती संदर्भातील या संदेशाला पालकांचेही मुलींना सहकार्य मिळत आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळांमधुन हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी समाधान व्यक्त केले आहे. या अभियानासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश कांगने, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळने, नांदेड जिल्हा बालविवाह निर्मूलन प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे यांचे विशेष योगदान लाभत आहे.
मला सावित्रीची लेक बनवा
जिल्हा महिला आणि बालविकास विभाग, युनिसेफ एसबीसी-3 यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मुलनासाठी जिल्ह्यात अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्या उपक्रमाला आता या उपक्रमाची जोड देण्यात आली आहे. “माझे वय 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी माझा बालविवाह करू नकात बाबा!,
मला शिक्षण घेवू द्या. मला सावित्रीची लेक बनवा आणि ज्योतिबांचा समृद्ध वारसा पुढे नेऊ द्या. माझी इच्छा पूर्ण कराल ना आई बाबा!’ असे भावनिक पत्र देवून राखी पौर्णिमेची अनोखी ओवाळणी विद्यार्थीनींनी आपल्या आई वडिलांना मागतली आहे.