ऊस पीक वगळले :देऊळगावात नुकसान
देऊळगाव राजे – देऊळगावराजे आणि परिसरातील पिकांचे परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले असून कृषी विभाग आणि महसूल विभागाच्यावतीने देऊळगावराजे मंडलमधील गावांतील पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. मात्र, या पंचनाम्यातील जाचक अटींमुळे परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
या पंचनाम्यात काही जाचक अटी घातल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली आहे, त्यात लोकेशन कॅमेऱ्यात फोटो असणे अपेक्षित आहे आणि विशेष बाब म्हणजे ऊस पिकाला या पीक नुकसानीच्या पंचनाम्यातून वगळण्यात आले आहे. देऊळगाव राजे परिसरात मुख्य ऊस हेच पीक असून शेत तयार करणे, खताचा बेसल डोस, बेणे, खुरपणी, लागण असा जवळपास एकरी 25 हजार रुपये खर्च ऊस लागवडीच्या पहिल्या दोन-तीन महिन्यांत होतो. पण, शासकीय यंत्रणेच्या वतीने अजब फर्मान काढले आहे की, ऊस पिकाचा पंचनामे केले जात नाहीत.
सोमवारी (दि. 4) देखील परिसरात जोरदार पाऊस झाला असून पुढील चार दिवस हवामान विभागाच्या वतीने पावसाचे सांगितले असल्याने ऊस पिकाचे परिसरात मोठे नुकसान होत आहे. पीक पंचनाम्यात ऊस पिकाचा देखील समावेश करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा, अशी मागणी समस्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.