राजीव गौडा : रोजगार निर्मिती रखडली, जनतेलाच “कॅशलेस’ करून टाकले
पुणे – अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात मोदी सरकार पूर्णतः अपयशी झाले आहे. रोजगारनिर्मिती थंडावून बेकारी वाढली आहे. औद्योगिक आणि कृषी क्षेत्राचे उत्पादन कमी झाले आहे. बचत दर कमी होऊन गुंतवणूक कमी झाली आहे. तर दुसरीकडे संस्थांचे खच्चीकरण केले जात आहे, असा आरोप अखिल भारतीय कॉंग्रेसचे प्रवक्ते राजीव गौडा आणि अमी याग्नीक यांनी केला.
कॉंग्रेस भवनातील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे रोजगार निर्मिती ठप्प झाली आहे. त्यामुळे बेकारीचा दर 45 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. डिजिटल अर्थव्यवस्था दूरच जनतेकडील पैसा काढून घेऊन त्यांना कॅशलेस केले. खासगी गुंतवणूक 16 वर्षांच्या नीचांकावर आहे.
वस्तूनिर्मिती क्षेत्र आणि निर्यात आघाडीवरही परिस्थिती बिघडत चालली आहे. बॅंकांचे एनपीए 8 लाख कोटींपेक्षा जास्त झाले आहे तर बॅंकातील घोटाळ्यांची संख्या वाढवून यातील रक्कम 1 लाख 74 हजार कोटी रुपयांच्या वर गेली आहे. जीएसटीमधून सरकारला या वर्षी 2 लाख कोटी रुपये कमी मिळणार आहेत, असे असताना केंद्र सरकारने कंपनी करात कपात केली आहे. मात्र, यामुळे मागणी वाढणार नाही असे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सरकारकडून संस्थांचे खच्चीकरण
एकीकडे आर्थिक परिस्थिती बिघडत चालली असताना अर्थव्यवस्थेशीनिगडित असलेल्या विविध संस्थांचे खच्चीकरण केले जात आहे. सांखिकी विभागाचेही खच्चीकरण केले जात आहे. कृषी क्षेत्राचा विकास दर केवळ 2 टक्के आहे. सरकार फक्त आधारभूत किमती वाढविण्याच्या घोषणा करते. मात्र, प्रत्यक्षात या वाढविल्या जात नसल्याचे ते म्हणाले. मुक्त व्यापार कराराच्या अगोदर कॉंग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांनी या कराराला जोरदार विरोध केल्यामुळेच भारताने या करारावर हस्ताक्षर करण्याचे नाकारले असल्याचा दावा गौडा त्यांनी केला. आता आर्थिक परिस्थितीबाबत कॉंग्रेस देशात भाजप सरकारविरोधात रान उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.