पाथर्डी: दुष्काळ व नापिकीमुळे मुलांचे शिक्षण व मुलीच्या विवाहासाठी पैसे उपलब्ध करू शकत नसल्याच्या नैराश्यातून तालुक्यातील सोनोशी येथील शेतकरी संभाजी आसाराम काकडे (वय 41) यांनी लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी (दि.8) उघडकीस आली.
अधिक माहिती अशी की, सोनोशी गावात संभाजी काकडे हे पत्नी व दोन मुलांसह राहात होते. मुलगा व मुलगी शिक्षण घेत आहेत. दुष्काळाने दोन वर्षांपासून शेतातून काहीच उत्पन्न मिळाले नाही. घरातील वाढता खर्च व कमी झालेले उत्पन्न, यामुळे काकडे हे नैराश्यात गेले होते. शिक्षण व मुलीचा विवाह याची त्यांना चिंता होती. त्यातूनच काकडे यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पाथर्डीतील उपजिल्हा रुग्णालायत उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी?
संभाजी काकडे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचे समजते. पंचनामा करताना पोलिसांच्या हाती ही चिठ्ठी लागली आहे. चिठ्ठीतील मजकूर समजला नाही. नापिकी, दुष्काळ व पैशाच्या विवंचनेतून काकडे यांनी आत्महत्या केल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे.