मुंबई – गडकिल्ल्यांना हात लावायची हिंमत सरकारने देखील करू नये, असा इशारा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. जर उत्पन्नच हवे असेल तर गडकिल्ले भाड्याने देण्याऐवजी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्या, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.
डोंबिवली येथे आयोजीत एका कार्यक्रमात ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, राज्यातल्या गडकिल्ल्यांना हात लावायची हिंमत देखील करू नका. कारण महाराष्ट्रातील इतिहासप्रेमी व शिवप्रेमी हे कधीच सहन करणार नाही. त्यामुळे या निर्णयाचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील.
महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास लाभला आहे. मात्र सरकारला याचे काही देणे-घेणे नाही. त्यामुळे नागरिकांच्या भावनेबाबत त्यांना काही वाटत नाही. सरकारला जर उत्पन्नच हवे असेल तर त्यांनी मंत्र्यांचे बंगले भाड्याने द्यावेत, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर आसूड ओढला.