नवी दिल्ली – शेतकऱ्यांनी दिल्लीतील आपले आंदोलन मागे घेऊन आता घरी परतावे असे आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले आहे.
आज एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की सरकारने हे कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव संमत केला आहे त्यामुळे आता हे आंदोलन आणखी ताणण्यात अर्थ नाही. संसद अधिवेशनात या संबंधातील अधिकृत प्रस्ताव जोपर्यंत संमत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय शेतकरी आंदोलकांनी घेतला आहे.
संसदेचे अधिवेशन येत्या 29 तारखेपासून सुरू होत आहे. त्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय संमत करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या ज्या अन्य मागण्या आहेत त्यावर विचार करण्यासाठी सरकारने एक सर्वसमावेशक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे त्यांच्या अन्य मागण्यांविषयी सर्वंकष विचार केला जाणार आहे, असे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी त्वरीत आंदोलन मागे घेणे योग्य ठरेल असेही ते म्हणाले.
सरकारतर्फे जी समिती स्थापन केली जाणार आहे त्यात शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींचाही समावेश असणार आहे. शेतातील राब जाळणे हा गुन्हा ठरवता कामा नये अशी शेतकऱ्यांची आणखी एक मागणी होती तीही सरकारने मान्य केली आहे असे तोमर यांनी यावेळी नमूद केले.