नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन कि बात या त्यांच्या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी आपल्या देशातले शेतकरी हे ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पेनचा कणा आहेत असे वक्तव्य केले आहे. “असे म्हणतात की जो जमिनीशी जोडलेला असतो तो कोणत्याही संकटांचा सामना अत्यंत प्रभावीपणे करु शकतो. आपल्या देशातले शेतकरी हे याचंच उदाहरण आहेत. देशातल्या शेतकऱ्यांनी करोना काळात पाय जमिनीवर घट्ट रोवून या संकटाला तोंड दिले आहे. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेचा कणा आपल्या देशातले शेतकरी आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
History of stories is as ancient as the human civilization itself. 'Where there is a soul, there is a story'…. In India, there has been a rich tradition of storytelling. We're proud to be denizens of land that nurtured tradition of Hitopadesha & Panch Tantra: PM on #MannKiBaat pic.twitter.com/xT0XQCCerH
— ANI (@ANI) September 27, 2020
शेती क्षेत्रात अनेक नवे बदल होत आहेत. या बदलांची चर्चा माझ्याशी शेतकरी संघटना करत असतात. करोना काळात शेतकरी ज्या पद्धतीने संकटाचा सामना करत आहेत त्यांचं उदाहरण एक आदर्श आहे असेही मोदींनी म्हटले आहे. करोना काळात सगळं जग नव्या आव्हानांना तोंड देतो आहे. करोना काळाचा एक फायदाही झाला आहे की अनेक कुटुंब एकत्र आली. मात्र आता सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. आता लोकांना जास्त काळ घरात राहणं कठीण होत चाललं आहे. मात्र हल्लीच्या काळात कुटुंब पद्धतीही बदलली आहे.
घरात ज्येष्ठ माणसं नसल्याने गोष्टी सांगण्यास कुणी नाही. तसंच मिळालेला वेळ आपण कसा घालवायचा हा प्रश्न अनेक कुटुंबांपुढे उभा ठाकला आहे. हितोपदेश आणि पंचतंत्र यांची परंपरा असलेला आपला देश आहे. धार्मिक कथा सांगण्याचीही देशाला परंपरा आहे. आपल्याकडे विविध धार्मिक कथा प्रसिद्ध आहेत. मन की बात या कार्यक्रमात स्टोरी टेलिंगच्या सदस्यांनी तेनाली रामा आणि कृष्णदेवराय यांची गोष्टही सांगितली. देशातल्या नागरिकांनी दर आठवड्याला गोष्टींसाठी, कथांसाठी वेळ काढावा असेही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
करोना काळाने आपल्याला एकत्र राहण्याचं महत्त्व शिकवलं आहे. अशावेळी कथा सांगण्याची कला अवगत करा असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच जे कथा सांगतात त्यांना मी हे आवाहन करु इच्छितो की आपला देश गुलामीत होता त्यावेळी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी योगदान दिलं त्यांचं महत्त्व या कथांमधून सांगा असंही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.