पराग शेणोलकर
कराड – लॉकडाऊनच्या काळात फक्त जीवनावश्यक वस्तूंसह शेतीमाल वाहतुकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री बाळासाहेब यांनी परवानगी दिली आहे. मात्र, शेतीचे प्रमुख औजार असणाऱ्या ट्रॅक्टरला डिझेल नाकारले जात आहे. तर, शेतमाल वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे. त्यामुळे कराड तालुक्यातील शेतीची सर्व कामे रखडली असून पशुधन धोक्यात आले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र लॉकडाऊन तर राज्यात त्यांच्या जोडीला संचारबंदी आहे.
याचा प्रशासनावर प्रचंड ताण आहे. या आपद्कालीन परिस्थितीत जीवनावश्यक सेवा तसेच शेतीप्रधान देशात शेतीशी संबंधित कामे, वाहने तसेच शेतमाल वाहतुकीला मुभा देण्यात आली आहे. सुरूवातीच्या दोन दिवसात नेमके काय बंद आणि काय सुरू याविषयी अधिकारी वर्गातही मोठा संभ्रम दिसून आला. मात्र, त्यांना शासनाने काय बंद राहणार आणि काय सुरू राहणार याविषयीचे आदेशच काढले. प्रत्यक्ष ग्राऊंडवर काम करताना बंदची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी काय करावे लागत आहे तशा आलेल्या शिफारशींचा अभ्यास करून ते निर्णय घेण्यात आले आहेत. जीवनावश्यक वस्तूंमध्ये प्राधान्याने किराणामाल, दूध, भाजीपाला व औषधे यांना प्राधान्य देण्यात आले आहे. हे घेण्यासाठी कोणीही गर्दी करू नये. सोशल डिस्टनसिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
परंतु, शेतीप्रधान देशात शेतीची नित्याची कामे ही शेतकऱ्यांना करावी लागणार आहेत. शेताला पाणी देणे, भांगलण, लागवड टाकणे, खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतीच्या मशागती करणे, तयार शेतमाल बाजारपेठेत घेऊन जाणे व त्याची विक्री करणे आदी कामांसह पशुधन संभाळण्याची प्रमुख जबाबदारी शेतकऱ्यांवर आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी पशुधन आहेच. अनेक शेतकऱ्यांनी विविध योजनातून गायी, म्हैशीचे मोठे गोटे उभारले आहेत. शेळीपालन व्यवसायालाही चालना दिली आहे. या सर्व प्रकारातील जनावरांना लागणारे खाद्य, औषधे तसेच महत्वाचे म्हणजे सुखा व ओला चारा अत्यावश्यक आहे. यासाठी शेतकरी चारा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. सध्या शाळू व हायब्रीडच्या कडब्याला व डोंगरी गवताला प्रचंड मागणी आहे. ही सुखी वैरण जनावरांसाठी अत्यंत पोषक आहे. शिवाय पावसाळ्यात या चाऱ्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होतो. सध्या रब्बी हंगामातील शेतकरी शाळू व गहू काढण्याच्या लगबगीत आहे. तोही लॉकडाऊनच्या सोशल डिस्टनसिंग नियमांचे पुरेपूर पालन करून.
राज्यातील शेतकरी त्याला येणाऱ्या अडचणी व पशुधन आदींचा सारासार विचार करून मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी बैठक घेऊन शेतीकामांचा घोटाळा होणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. तसेच शेती कामासाठी डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी स्पष्ट सूचना ना. बाळासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत. मात्र, शेतीकामासाठी ना पेट्रोल पंपवाले सहकार्य करत आहेत ना प्रशासन त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहेच तर कराड तालुक्यातील पशुधनही धोक्यात आले आहे.
शेती कामाला मिळणार डिझेल व पेट्रोल करोनाचा फैलाव रोखण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र देशाच्या अर्थ व्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्याला शेतमाल वाहतूक व शेतकामासाठी अडचण येऊ नये, याकरिता आवश्यक असणारे डिझेल आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष, समिती सचिव, तलाठी यांच्या सहीच्या पत्रानुसार दोन लिटरपर्यंत पेट्रोल तसेच आवश्यकतेनुसार 20 लिटरपर्यंत डिझेल पुरवण्याबाबतचा आदेश पेट्रोल पंपधारकांना काढण्यात आला आहे. या आदेशामुळे शेतकऱ्याला दिलासा मिळाला खरा मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
शेतीकाम तसेच शेतमाल वाहतुकीस जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. मात्र, संचारबंदीचे उल्लंघन होणार नाही यांची दक्षता घेणे आवश्यक आहे. आदेशातील तरतुदीनुसार डिझेल देण्याचे आदेश पेट्रोल पंपधारकांना देण्यात आले आहेत.
उत्तम दिघे , प्रांताधिकारी, कराड