संगमनेर – तालुक्यातील झोळे येथे शेतात जाण्याचा रस्ता शेतकऱ्याच्या पुतण्यांनी बंद केला होता. याबाबत या शेतकऱ्याने वारंवार रस्ता सुरू करण्याची मागणी केली. मात्र त्यांच्या पुतण्यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे या शेतकऱ्याची शेती पडिक राहू लागली. तसेच कायमच्या वादाला कंटाळून नैराश्य आलेल्या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
बच्छाव धोंडिबा खर्डे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांचा मुलगा सूर्यभान बच्छाव खर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आम्ही तिघे भाऊ नोकरीनिमित्त वेगवेगळ्या शहरात राहात आहोत. त्यामुळे गावातील घरी वडील एकटेच राहात आहेत. वडिलोपार्जित शेतीची वाटणी झाल्यानंतर शेतात जाण्याचा रस्ता त्यांचे पुतणे नानासाहेब भिकाजी खर्डे व बाळू भिकाजी खर्डे यांनी बंद करून त्या ठिकाणी जमीन तयार केली. त्यामुळे वडिलांना शेतात जाण्यास रस्ताच नव्हता. त्यामुळे शेती पडिक राहात होती.
याबाबत वडिलांनी वेळोवेळी पोलिसांत तक्रार केली होती. तसेच तहसीलदारांकडेही तक्रार केली होती. मात्र संबंधित कायमच शिवीगाळ व अपमान करत होते. या त्रासास कंटाळून वडिलांनी 3 ऑक्टोबर रोजी विषारी औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी संगमनेर येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रकृती खालावल्याने त्यांना नाशिक येथील रुग्णालयात दाखल केले होते.
याप्रकरणी पोलिसांनी सूर्यभान खर्डे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात नानासाहेब भिका खर्डे, सुधीर ऊर्फ बाळू भिका खर्डे, सुनंदा सुधीर ऊर्फ बाळू खर्डे, अभिषेक बाळू खर्डे, पूजा बाळू खर्डे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.