बीड – अतिवृष्टी, नापिकीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशातच शेतात जे काही पिकलं ते विकून घरी परतताना मिळालेल्या पैशावर चोरट्यांनी डल्ला मारला. त्या तणावातून वृद्ध शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आष्टी तालुक्यातील आष्टा गावात घडली आहे.
कांतीलाल बाबासाहेब गळफाटे (वय 59) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गळफाटे हे उडीद विकून घरी परतत होते, यावेळी त्यांच्या पैशावर चोरट्यांनी डल्ला मारला. त्यांच्याजवळील 25 हजार रूपये चोरट्यांनी चोरून नेले. या प्रकारानंतर तणावात असलेल्या कांतीलाल यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी आष्टी पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.