कांगारूंच्या भूमीवर यंदा दाखल झालेला भारतीय संघ गत मालिकेची पुनरावृत्ती करणार का, हा प्रश्न सतावत असला तरीही यंदा भारताला हा चमत्कार करण्याची नामी संधी आहे. स्टिव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्या सहभागामुळे भारतासमोरचे आव्हान जास्त खडतर आहे. भारतीय संघ पहिल्या सामन्यातच ढेपाळला. भारतीय गोलंदाजी पहिल्या सामन्यातच अपयशी ठरली असली तरीही पुढील सामन्यांमध्ये त्याचा वचपा काढून कांगारूंची शिकार करण्याची नामी संधी भारताला आहे. यंदाचा हा दौरा एकदिवसीय, टी-20 व कसोटी या क्रिकेटच्या तीनही प्रकारात होत आहे. एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू झाली असून आता त्यातील पहिल्या सामन्यात भारताला जरी दारूण पराभव पत्करावा लागला असला तरीही उर्वरित दोन सामन्यांत ते यशस्वी पुनरागमन करू शकतात.
भारतीय संघाने गेल्या काही दशकांत पर्यटक म्हणून एखाद्या दौऱ्याची सुरुवात केली असली तरीही नंतर त्यांनी हे दौरे जिंकण्याची करामतही करून दाखवली आहे. गेल्या दौऱ्यातही ऑस्ट्रेलियात भारताच्या गोलंदाजांनी राळ उठवली होती. भल्या भल्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले होते. हीच कामगिरी व तेच सातत्य यंदाही कायम राहील, याची ग्वाही जसप्रीत बुमराह व महंमद शमी यांनी सातत्याने दिली आहे. कांगारूंच्या भक्कम फलंदाजीला पूर्वीचे वलय राहिलेले नाही. पूर्वी त्यांचे पाच फलंदाज तंबूत परतले तरी सहावा व सातव्या क्रमांकाचा एखादा ऍडम गिलख्रीस्ट किंवा डेमियन मार्टिन डाव सावरायचा. आता ती फलंदाजीची खोली सध्याच्या त्यांच्या संघात राहिलेली नाही.
सध्याच्या भारताच्या संघाची फलंदाजी पाहिली तर आठव्या क्रमांकापर्यंत भक्कम फलंदाजी करणारे खेळाडू आहेत. अगदी काही नाही तरी शमी देखील आठव्या क्रमांकावर येत वादळी फलंदाजी करण्याची क्षमता बाळगून आहे. सध्या भारतीय संघाने केवळ एकदिवसीय तसेच टी-20 मालिकेवर लक्ष ठेवण्यापेक्षा कसोटी मालिकेवरच लक्ष ठेवले पाहिजे. कारण आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत इतके महिने सातत्याने पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारतीय संघाला घरात बसूनच ऑस्ट्रेलियाने द्वितीय क्रमांकावर ढकले आहे. आयसीसीच्या गुणांकन पद्धतीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मार्चपासून जगभरात करोनाचा धोका सुरू झाल्यानंतर आयसीसीच्या एकाही मोठ्या स्पर्धेला मुहूर्त लागलेला नाही. इंग्लंडमध्ये वेस्ट इंडिज, पाकिस्तान व ऑस्ट्रेलिया यांनी मलिका खेळल्या मात्र, त्या आयसीसीच्या नव्हत्या. आयसीसीची कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू झाली होती त्याला आता एका वर्षापेक्षा जास्त काळ लोटला असला तरीही त्यात ऑस्ट्रेलियाने फार काही कर्तृत्व दाखवलेले नसतानाही त्यांना आग्रक्रम देण्यात आला याचेही आश्चर्यच वाटत आहे.
नवोदितांकडे लक्ष
मयंक आग्रवाल, शुभमन गील हे कसे खेळ करतात यावरच भारताचे पुढील कसोटी दशक अवलंबून राहणार आहे. रोहित, चेतेश्वर पुजारा, हार्दिक पंड्या यांच्यामुळे भारतीय संघाची फलंदाजी यजमान संघापेक्षा जास्त सरस आहे. जर या मालिकेत आग्रवाल, गील, पृथ्वी शॉ हे नवोदित यशस्वी ठरले तर भारताला पुढील दशकासाठी भक्कम सेकंड बेंच मिळेल असा विश्वास वाटतो.
ऑस्ट्रेलियाला फलंदाजांची चिंता
सलामीवीर अरन फिंच, ग्लेन मॅक्सवेल यांच्या नावाचे वलय मोठे आहे पण त्यांना आयपीएल स्पर्धेत आलेले अपयश पाहता भारताविरुद्धच्या मालिकेत त्यांच्यावर अवलंबून राहणे यजमान संघाला परवडणारे नाही. त्यांच्या फलंदाजीची खरी मदार कर्णधार टीम पेनी, स्टिव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्यावरच राहणार आहे. भारताच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे. त्यातही भारताची फिरकी गोलंदाजी देखील त्यांची डोकेदुखी ठरू शकते. गेल्या वेळी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात 2-1 असा विजय मिळवत भारताने इतिहास घडवला होता. यंदाही त्याच यशाची पुनरावृत्ती व्हावी हीच अपेक्षा आहे. कागदावरची बलाढ्य फलंदाजी प्रत्यक्ष मैदानावरही बलाढ्य ठरली तर कांगारूंची शिकार करण्यात यश मिळेल.
भारतीय फलंदाजी सर्वात बलाढ्य
सध्याच्या काळातील सर्वात बलाढ्य फलंदाजी म्हणून भारतीय संघाकडे पाहिले जाते. कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, मयंक आग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, लोकेश राहुल असे आठ फलंदाज संघात आहेत. त्यानंतरही फलंदाजीला खोली आहे. शमी, जडेजा, अश्विन हे जरी संघात एक गोलंदाज म्हणून असले तरीही त्यांच्याकडे उपयुक्त फलंदाजी करण्याची क्षमता आहे.
पेस बॅटरी भारताचीच सरस
भारताकडे बुमराह व शमी ही प्रमुख अस्त्रे असली तरीही नवोदित महंमद सिराज, टी. नटराजन, इशांत शर्मा यांच्याकडूनही सरस व सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा राहणार आहे. कसोटी संघाची अंतिम निवड करायची झाली तर रवींद्र जडेजाला संघात कायम राखणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकतर त्याच्या समावेशाने संघात अष्टपैलू खेळाडूची उणीव भरून निघेल. जडेजाचा अनुभव व डावखुरी फिरकी कांगारूंसाठी नेहमीच सरप्राइज पॅकेज ठरले आहे. बुमराहची राउंड आर्म अक्शन अणि फसवा वेग कांगारूंवर भारी ठरेल. त्याचे भन्नाट यॉर्कर आणि शमीचे रिव्हर्स स्विंग ऑस्ट्रेलियाला चांगलेच मारक ठरतील.
ऑसी तिकडी धोकादायक
मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स व जोश हेझलवूड या वेगवान तिकडीवर ऑस्ट्रेलिया गोलंदाजीची मदार आहे. अमिरातीत नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेत हेझलवूड व कमिन्सने सरस कामगिरी केली होती. करोनाच्या काळानंतर स्टार्क मात्र, पहिल्यांदाच खेळत असल्याने पहिल्या सामन्यापासूनच लयीत येण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागणार आहे.
कोहलीची रजा त्रासदायक
अनुष्का शर्मा गर्भवती असल्याने तिची काळजी घेण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पालकत्व रजा घेतली आहे. त्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशात पतणार आहे. अशा स्थितीत मुंबईकर अजिंक्य रहाणे किंवा रोहित शर्मा यांच्याकडे संघाची धुरा येण्याची शक्यता आहे. कोहलीची कांगारूंच्या देशातील आकडेवारी समाधानकारक आहे. त्यांची कसोटी सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. त्यामुळे या मालिकेत तिसरा किंवा चौथा क्रमांक बाळगणारा फलंदाज कोहलीच्या दर्जाचा नसणार हे स्पष्ट आहे. कोहलीच्याच खांद्यावर संघाच्या मोठ्या धावसंख्येची जबाबदारी राहत आहे. त्याला रोहितने अनुकूल पर्याय दिला तरच सिडनी, मेलबर्न किंवा पर्थवर भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारू शकेल. पर्थ द फास्टेट विकेट ऑन अर्थ, असे म्हटले जात होते. गेल्या काही वर्षात मात्र, पर्थची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला नव्हे तर फिरकीला साथ देत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. त्यातही बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्नवर असला तरीही तिथे स्विंग गोलंदाजीला जास्त मदत मिळते. आता दोन्ही संघांचे बलाबल पाहिले तर बुमराह, शमी यांच्या वेगवान स्विंगवर वॉर्नर, स्मिथ स्थिरावतील मात्र, अन्य फलंदाजांचे काय? त्यांचा कसोटीचा कर्णधार टीम पेनी याला केवळ काटेरी मुकुट मिरवण्यासाठी कर्णधार केले गेले असल्याचे जाणवते. त्याच्याकडे ना अनुभव आहे ना भारताच्या फिरकी गोलंदाजीला उत्तर. गत मालिकेत भारतीय संघाने त्याच्यासह संपूर्ण कांगारू फलंदाजीचा पालापाचोळा केला होता. त्यांची फलंदाजी कसोटी मालिकेत तरी वॉर्नर व स्मिथ यांच्यावरच अवलंबून राहणार आहे. हे दोघे खेळले तर त्यांना आव्हान निर्माण होईल अन्यथा त्यांची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळायला वेळ लागणार नाही.
क्रीडारंग- अमित डोंगरे