मुंबई : महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि या आघाडीचे महत्वाचे शिल्पकार मानले जाणारे खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे गौप्यस्फोट केले आहेत. गेल्यावर्षी राज्यात रंगलेल्या सत्तानाट्यामध्ये अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन राजभवनावर शपथविधीचा कार्यक्रम उरकला होता. ही घटना का घडली होती याबाबत खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे. राऊत यांनी सामनातील रोखठोक या आपल्या सदरातून याविषयी स्पष्टीकरण दिले आहे.
आपल्या सदरात राऊत यांनी म्हटलं आहे की, नेहरु सेंटरमध्ये 22 नोव्हेंबर रोजी सत्तेसाठीच्या वाटाघाटी सुरु असताना मल्लिकार्जुन खर्गे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली होती. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी खर्गे ठाम होते. यावरुन खर्गे आणि शरद पवार यांच्या शाब्दिक चकमक झाली. पवार त्यावेळी खूपच संतापले होते, त्यामुळे ते बैठकीतून उठले आणि निघून जाऊ लागले. ते त्राग्याने टेबलावरील कागद गोळा करत होते. ते निघाले त्यांच्या पाठोपाठ मी व प्रफ्फुल पटेल धावत गेलो. याच बैठकीत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील हे शरद पवार यांनी सुचवले होते. पण खर्गे आणि पवार यांच्या चकमकीने बैठकीचा नूर पालटला होता. यावेळी अजित पवार बराच वेळ खाली मान घालून मोबाईलवर चॅटिंग करत होते. त्यानंतर त्यांचा फोन स्वीच ऑफ झाला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे थेट राजभवनावर शपथविधी सोहळ्यातच दर्शन झाले.
संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, अजित पवारांचा फोन स्वीच ऑफ झाला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे थेट राजभवनावर शपथविधी सोहळ्यातच दर्शन झाले. त्यांचा शपथविधी सुरु असताना एक महत्वाचा फोन आला. ‘तुमचे सरकार बनत नाही, फडणवीस-अजित पवार शपथ घेत आहेत. अजित पवारांनी एनसीपी फोडली’. मी त्यावेळीही सांगितले चार वाजेपर्यंत थांबा, अजित पवारांसोबत गेलेले परत येतील. स्वत:अजितदादाही गुदमरुन परत येतील.
संजय राऊत यांनी लिहिले आहे की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार आणि अमित शाह यांच्यात दिल्लीत बैठक झाली त्यामुळे पहाटेच्या शपथविधीचे नाट्य तयार झाले ही चर्चा सर्वस्वी चूक आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. दिल्लीत पवार आणि माझ्यामध्ये उत्तम संवाद होत होता. रोजच आम्ही भेटत होतो. भाजपशी डील करण्याच्या ते मनस्थितीत नव्हते. पण भाजपकडून ऑफर्स येत असल्याचे सांगत होते. लवकरच पंतप्रधान मोदींची भेट घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणे शक्य नसल्याचे आपण त्यांना सांगणार असल्याचेही त्यांनी मला सांगितले होते. याच काळात शेतकरी प्रश्नांसंदर्भात पवारांनी मोदींची भेट घेतली आणि राज्यातील सत्तेबाबतही स्पष्टीकरण दिले. त्यामुळे शरद पवारांनी भाजपला शब्द दिला होता. त्यामुळेच पहाटेच्या हालचाली झाल्या हे खोटं आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
राऊत म्हणाले की, वर्षभरापूर्वी झालेल्या 36 दिवसांच्या सत्तानाट्यावर आत्तापर्यंत चार पुस्तकं आली. पण मी या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे त्यामुळे मी यावर कधी पुस्तक लिहिणार असे विचारले जाते. मी जर यावर पुस्तक लिहिलं तर इतर चार पुस्तकं खोटी ठरतील. त्यामुळे शरद पवार आणि माझी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर गुप्त बैठक झाल्याचं खोटं आहे, मी त्यांना नेहमीच उघडपणे भेटतो. त्यामुळे सत्तानाट्याची ही पटकथा अद्याप पडद्यामागेच आहे व राहिल, असंही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.