कॉंग्रेससह विरोधी पक्षाच्या सदस्यांचा सभात्याग
नवी दिल्ली – भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज संसदेमध्ये पडले. त्यातच संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या वक्तव्याचीही भर पडली आणि कॉंग्रेससह काही विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप घेऊन सभात्याग केला. भाजपचे सदस्य हे महात्मा गांधींचे खरे अनुयायी आहेत. तर कॉंग्रेस हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी या “बनावट गांधी’ चे अनुयायी आहेत, असे जोशी म्हणाले होते. शून्य प्रहराच्या सुमारास या वक्तव्यामुळे लोकसभेमध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. कॉंग्रेससह द्रमुक, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेसच्या सदस्यांनीही सभात्याग केला.
“सीएए’ आणि “एनआरसी’च्या मुद्दयावरून देशभर शांततामय मार्गाने निदर्शने केली जात आहेत. महात्मा गांधींच्या अहिंसेच्याच मार्गाने हे आंदोलन केले जात आहे, असे कॉंग्रेसचे अधिररंजन चौधरी यांनी सांगितले. जगभरातून ज्यांच्याबद्दल आदर व्यक्त होतो, त्या महात्मा गांधींवरच टीका केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. याचवेळी कॉंग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी सरकारच्याविरोधात घोषणाबाजी केली.
मात्र महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीच्या निमित्ताने भाजपने पदयात्रा काढली. हा वाद अनावश्यकपणे उपस्थित केला जात आहे, असे प्रल्हाद जोशी म्हणाले. हेगडे यांना दिलगिरी व्यक्त करण्यास सांगण्यात आले आहे. महात्मा गांधींचे खरे अनुयायी भाजपच आहे. कॉंग्रेस तर “बनावट गांधी’चे अनुयायी आहेत.
जोशी यांच्या विधानाला चौधरी यांनी आक्षेप घेतला. पण तरिही प्रल्हाद जोशी आपल्या विधानावर ठाम राहिले. राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे जामिनावर असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यावर संतापलेल्या कॉंग्रेस सदस्यांनी सभात्याग केला.