नवी दिल्ली :कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मंगळवारी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. देशातील बेरोजगारीने अनेक वर्षांची उच्चांकी पातळी गाठली आहे. त्याला योगायोग म्हणायचे की मोदींचा प्रयोग, असा सवाल त्यांनी केला.
का विरोधात दिल्लीतील शाहीन बाग आणि इतर भागांत सुरू असलेली निदर्शने म्हणजे योगायोग नव्हे. ती निदर्शने म्हणजे एक प्रयोग आहे. त्यामागे देशाचा सलोखा उद्धवस्त करण्याचे राजकीय कारस्थान आहे, असा आरोप मोदी यांनी सोमवारी केला. त्याचा समाचार प्रियांका यांनी घेतला. त्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या प्रचारासाठी बंधू राहुल यांच्या समवेत झालेल्या संयुक्त सभेत बोलत होत्या.
मोदी त्यांच्या भाषणांमध्ये बेरोजगारीचा साधा उल्लेखही करत नाहीत, अशी खिल्लीही त्यांनी उडवली. महत्वाच्या सात क्षेत्रांमध्ये मागील काही वर्षांत साडेतीन कोटींहून अधिक लोकांच्या नोकऱ्या गेल्याशी संबंधित अहवालाचा संदर्भ त्यांनी मोदींवर टीका करताना दिला.
दिल्लीला उत्तरप्रदेशसारखे बनवण्याची भाषा भाजपकडून केली जाते. मात्र, उत्तरप्रदेशात विकासाचे कुठलेच चिन्ह दिसत नाही. त्या राज्यात अराजकता पसरली असून गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असल्याचा दावा प्रियांका यांनी केला. भाजप आणि आप या पक्षांकडून जाहिरातबाजीवर कोट्यवधींची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.