दिल्लीच्या प्रचार सभेत राहुल गांधी यांची टीका
नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात कॉंग्रस नेते राहुल गांधीही निवडणूक प्रचारात उतरले आहेत. त्यांनी आज येथे घेतलेल्या प्रचार सभेत केजरीवाल आणि मोदी या दोघांवरही टीका केली आहे. दिल्लीतील बेरोजगारांना रोजगार कसा देणार याविषयी काही कार्यक्रम देण्याऐवजी केजरीवाल आणि मोदी हे एकमेकांशीच भांडत बसले आहेत असे त्यांनी म्हटले आहे. दोघांनाही समाजात द्वेष पसरवायचा आहे कॉंग्रेस सत्तेसाठी हा प्रकार कधीही करणार नाही असे ते म्हणाले.
भाजप व मोदींवर टीका करताना ते म्हणाले की ते हिंदु धर्माच्या गोष्टी करतात, इस्लाम आणि शिखांविषयीही ते बोलतात. पण त्यांना धर्माचा अभ्यासच नाही. सर्व धर्माचा अभ्यास करा त्यात कोठेही दुसऱ्यांवर हल्ला करण्याची शिकवणूक दिलेली नाही असे ते म्हणाले.मोदी आणि संघाचे हे कसले हिंदुत्व आहे असा सवाल करून त्यांनी म्हटले आहे की, हिंदुधर्मात सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची शिकवणूक दिली आहे.
जंगपुरा मतदार संघातील कॉंग्रेस उमेदवार तरविंदरसिंग मारवाह यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांनी ही सभा घेतली होती. ते म्हणाले की पाकिस्तानात जाऊन हिंदुस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या एका भाजप नेत्याचे नाव मला सांगा, पण आपल्या येथील उमेदवाराने पाकिस्तानात जाऊन हिंदुस्तान झिंदाबादचा नारा दिला आहे त्याबद्दल त्यांना तेथे कारावासही भोगावा लागला आहे असे त्यांनी निदर्शनाला आणून दिले.