जर आपण करोनाच्या पहिल्या लाटेपासून धडा घेतला असता आणि आपल्या आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले असते तर आपल्याकडे पैशांची अजिबात कमतरता नव्हती; परंतु करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाला दिवसा तारे दाखवले. रामभरोसे असलेल्या आरोग्य सुविधांची खरी परिस्थिती समोर आली.
देशभरात करोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत चालली आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांवर प्रचंड ताण पडत आहे. रुग्णालयात दाखल करायचे झाल्यास अनेक रुग्णांना खाट मिळत नाही, अशी अवस्था आहे. जीवरक्षक औषधांची आणि ऑक्सिजनचीही टंचाई संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. व्हेंटिलेटरची व्यवस्था तर मूठभर लोकांपुरतीच सीमित राहिली. अशी स्थिती का आली? ही आपत्ती अचानक येऊन कोसळली का? करोनाने आपल्याला सावरण्याची संधीच दिली नाही का? आपण काय तयारी केली होती? करोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढा देताना आपण सपशेल अपयशी का ठरलो? याची कारणमीमांसा करणे आत्यंतिक गरजेचे बनले आहे.
आपल्या देशाची लोकसंख्या सुमारे 135 कोटी इतकी आहे. म्हणजेच देशाची एक टक्का लोकसंख्या होते 1 कोटी 35 लाख. आता या लोकसंख्येचा दहावा भाग म्हणजे 0.001 टक्के लोकसंख्या म्हणजे सुमारे 1 लाख 35 हजार होतात. देशात करोनाची दुसरी लाट आली त्यानंतर एप्रिलच्या शेवटच्या एकाच दिवसात जास्तीत जास्त 4 लाख लोकांना करोनाची लागण झाली. हा आकडा देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 0.03 टक्के आहे. एवढ्या रुग्णांच्या भारानेच देशाच्या आरोग्य यंत्रणेची संपूर्ण संरचना डळमळीत झाली. अशा वेळी एक सवाल डोक्यात येणे स्वाभाविक आहे, की अखेर आपण आपल्या देशाची आरोग्य यंत्रणा कोणत्या आधारावर उभारली आहे? एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकांसाठी आपण आरोग्य यंत्रणा कार्यान्वित केली आहे?
ही परिस्थिती अशा वेळी उद्भवली आहे, जेव्हा देशाच्या शहरी भागातील 70 टक्के आणि ग्रामीण भागातील 65 टक्के जनतेचा भार खासगी क्षेत्रावर आहे. आपली आरोग्य यंत्रणा करोनाच्या ओझ्याखाली पूर्णपणे दबली गेली, भुईसपाट झाली याचा अर्थ आपली तयारी अत्यंत कमकुवत होती किंवा ती नव्हतीच! अखेर आपण आपली आरोग्य व्यवस्था किती लोकांसाठी तयार केली आहे? या प्रश्नाचे उत्तर मिळणे अत्यावश्यक आहे. मोठ्या गाड्या असलेले आणि आलिशान बंगल्यांमध्ये राहणारे आरोग्य यंत्रणेतील अधिकारी कधी या प्रश्नावर गांभीर्याने चिंतन करतात का? उच्चपदावर बसलेले अधिकारी अखेर करतात तरी काय? ही परिस्थिती ओढवेपर्यंत लोकहिताच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी डोळे झाकून का बसले होते? करोनामुळे देशभरात एप्रिल महिन्याच्या अखेरीपर्यंत एकंदर दोन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झालेला होता. याची जबाबदारी अखेर कुणावर आहे की नाही?
सरकारी आरोग्य यंत्रणेवर आणि सुविधांवर नजर टाकली असता येथील परिस्थिती भीतिदायक असल्याचे दिसते. रुग्णांना दाखल करण्यासाठी खाटा उपलब्ध नाहीत. जर एखाद्याला खाट मिळालीच तरी त्याला जीवरक्षक औषधे मिळत नाहीत. डॉक्टर नाहीत. रुग्णाला दाखल केले आहे; पण रुग्णालयात ऑक्सिजन नाही. वेळेवर जरी ऑक्सिजन मिळालाच तरी तो कधी संपेल सांगता येत नाही. एवढ्या धावपळीनंतरसुद्धा एखाद्या रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासलीच तर सर्वसामान्य रुग्णांसाठी व्हेंटिलेटर जवळजवळ नाहीतच! अशा स्थितीत सर्वसामान्य नागरिकाच्या वाट्याला पावलापावलावर केवळ लाचारी आणि अगतिकताच येत आहे.
करोनाचा कहर देशात मार्च 2020 मध्येच सुरू झाला होता. त्यावेळी ती करोनाची पहिली लाट असल्याचे मानले गेले होते. बरोबर एक वर्षानंतर करोनाची दुसरी लाट आली ती मार्च 2021 मध्ये या वर्षभरात आपण काहीही तयारी केली नाही. करोनाच्या पहिल्या लाटेनंतर देशभरात नेत्यांनी केवळ भाषणबाजी केली आणि आपण करोनाला हरवल्याची शेखी मिरवली. देशातील एक मोठे राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर असे सांगितले की, करोनाशी कसे लढायचे हे आमच्याकडून शिका! त्यानंतर जेव्हा करोनाची दुसरी लाट आली, तेव्हा देशाच्या इतर भागांप्रमाणेच या राज्याचीही प्रचंड वाईट स्थिती झाली. यादरम्यान देश अर्थव्यवस्था मोठी करण्याच्या बाता मारत होता. चीनवर नाराज झालेल्या जगभरातील कंपन्यांना भारतात येण्याचे आमंत्रण आपण देत होतो.
पाकिस्तानसह भूतान आदी आशियातील छोट्या-छोट्या देशांनी भारताला आरोग्याच्या क्षेत्रात मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. नेपाळ आणि बांगलादेशसारखे देश भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालत आहेत. अमेरिकेसह अनेक देशांनी आपल्या भारतातील नागरिकांना तातडीने भारत सोडण्यास बजावले आहे. एवढी जी पीछेहाट आपल्याला आरोग्याच्या क्षेत्रात दिसून आली, त्याला जबाबदार कोण? चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात निवडणूक घेणारा निवडणूक आयोग यासाठी जबाबदार आहे का? हरिद्वारमध्ये जमा झालेली लाखोंची गर्दी किंवा देशाच्या उत्तर भागात होळीच्या दिवशी खरेदीसाठी झालेली बेकाबू गर्दी याला जबाबदार आहे का?
उत्तर प्रदेशात करोनाचा सर्वोच्च बिंदू जेव्हा आला होता, त्याच वेळी तिथे पंचायतीच्या निवडणुका घेतल्या गेल्या. या घटनांसह दुसऱ्या लाटेला काय-काय कारणीभूत ठरले याचा शोध भविष्यात घेतला गेला पाहिजे. आपण घसरून पडणे ही आपली चूक नसते. परंतु पडल्यानंतर उठून स्वतःला सावरण्याची कला शिकणाराच यशाच्या शिखरावर पोहोचतो, हे कायम लक्षात ठेवले पाहिजे.
विश्वास सरदेशमुख