सुवर्णकन्येने सांगितले भारताच्या पीछेहाटीचे कारण
बेंगळुरू – प्रसार माध्यमे, प्रायोजक तसेच सर्वसामान्य प्रेक्षक यांच्या दुर्लक्षामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय क्रीडा क्षेत्रात अॅथलेटिक्सचे व पर्यायाने खेळाडूंचे प्रचंड नुकसान झाले आहे, असे मत देशाची सुवर्णकन्या पी. टी. उषा यांनी व्यक्त केले आहे.
अॅथलेटिक्सला मदर ऑफ ऑल स्पोर्टस असे संबोधले जाते. मात्र, अन्य देशाच्या तुलनेत भारतात या खेळाकडे सुरुवातीपासूनच प्रचंड दुर्लक्ष झालेले आहे. टींटू लुक्कासह गुणवत्ता असलेल्या शेकडो खेळाडू देशात आहेत मात्र, त्यांची साधी दखलदेखील माध्यमे, प्रायोजक तसेच क्रीडाप्रेमी घेत नाहीत. त्यांची ती क्षमता निश्चितच आहे, असेही उषा यांनी सांगितले.
लुक्का किंवा हिमा जासचे उदाहरण पाहा. त्यांनी गेल्या दोन मोसमात सातत्याने आपला ठसा उमटवला आहे. अनेक स्पर्धांमध्ये देशात तसेच परदेशातही देशाचे नाव उंचावले आहे. पण त्यांना किती प्रसिद्धी मिळाली याचाही विचार केला जावा. स्पर्धांमध्ये सहभागी होताना त्यांना आवश्यक असणारे साहित्यदेखील घेण्यासाठी त्यांना अनेक नकार पचवावे लागले. अॅथलेटिक्सकडेही गांभीर्याने पाहिले जावे. हे खेळडूदेखील जागतिक पातळीवरील तसेच ऑलिम्पिक स्पर्धेत पदके मिळवून देतील, असे मतही उषा यांनी व्यक्त केले.