मुंबई – भारतीय जनता पक्षाला सध्या आलेला ओबीसींचा पुळका हे केवळ नाटक आहे. ओबीसी आरक्षणाची आज जी स्थिती निर्माण झाली आहे त्याला केवळ देवेंद्र फडणवीस आणि भाजपच जबाबदार आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
ते म्हणाले की ओबीसींच्या संबंधात आज भाजप जे प्रेम दाखवत आहे ते पुतना मावशीचे प्रेम आहे. ते म्हणाले की मुळात देशातील आरक्षण संपवणे हा संघाचा मूळ अजेंडा आहे. त्या अनुरूप भाजप भूमिका घेत असते.
ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील आमचे आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोैच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे इम्पेरिकल डाटा मागितला पण भाजपच्या केंद्रातील सरकारने तो डाटा राज्य सरकारला दिला नाही म्हणून ओबीसींचे आरक्षण गेले असा दावा पटोले यांनी केला.
ते म्हणाले की, त्याच्याही आधी 2017 साली नागपुर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी फडणवीस यांनी ओबीसींचे रोस्टर क्लिअर करायचे म्हणून एक साधे परिपत्रक काढून तेथील निवडणुका पुढे ढकलल्या. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर भंडारा जिल्हा परिषद आणि अन्य जिल्हा परिषदाही कोर्टात गेल्या. 2018 साली हायकोर्टाने सांगितले होते की या विषयावर आयोग नेमा पण फडणवीस सरकारने त्यावेळी हा आयोग बसवला नाही. त्यावर निर्णय घेतला नाही म्हणून हे आरक्षण गेले असा आरोप पटोले यांनी केला.