Yuzvendra Chahal – भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघात स्थान मिळाले नसल्याने काहीसा निराश निश्चितच झालो आहे. मात्र, समोर आलेल्या प्रत्येक परिस्थितीला धीराने तोंड देणे इतकेच आपल्या हातात असते, अशा शब्दात भारताचा लेगस्पीन गोलंदाज यजुवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) आपल्या भावना व्यक्त केल्या.
आपण केवळ सरस कामगिरी करत राहणे व निवड समितीसमोर ही कामगिरी जेव्हा येईल तेव्हा ते माझ्या नावाचा निश्चितच विचार करतील, असेही चहल म्हणाला. माझ्याबात अनेकांनी मते व्यक्त केली. त्यांचा मी आभारी आहे.
मात्र, संघात 17-18 खेळाडूंची निवड करणे शक्य नसते, निवड समितीला केवळ 15 खेळाडूच निवडायचे असतात व त्यातही त्यांना जे सर्वोत्तम वाटतात त्यांची निवड होते. माझी निवड झाली नाही म्हणून मी निराश झालो आहे;
परंतु आता मला या सगळ्या गोष्टींची सवय होऊ लागली आहे. 2021 सालच्या आयपीएल स्पर्धेत सरस कामगिरी केल्यावरही मला त्यावेळी 2021 सालच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत संधी मिळाली नाही. तसेच 2022 सालच्या स्पर्धेतही मला संघात स्थान मिळाले नाही.
आता यंदाच्या आयपीएल स्पर्धेतही माझी कामगिरी चांगली झाली. मात्र, तरीही यंदाच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी माझ्या नावाचा विचार झाला नाही याची निराशा आहे.
मात्र, समोर येईल त्या परिस्थितीला सामोरे जाणे इतकेच आपल्या हातात असते. येत्या काळात कामगिरीत सातत्य राखण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त मेहनत घेईन व भविष्यात निवड समितीचे लक्षही वेधून घेईन, असेही चहल म्हणाला.
सातत्याने दुर्लक्ष !
आयसीसीच्या मोठ्या स्पर्धाच नव्हे तर यंदाच्या आशिया करंडक स्पर्धेतही चहलला संघात स्थान देण्यात आले नव्हते. 2020 सालापासून सातत्याने निवड समिती त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करत आहे.
2006 साली आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यापासून चहलच्या कामगिरीत अफलातून सातत्य राहिले आहे. मात्र, 2019 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक बळी घेतलेल्या चहलला यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेतही संधी देण्यात आलेली नाही.