नवी दिल्ली – फेसबुक इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनी बुधवारी संसदीय समितीसमोर कंपनीची भूमिका मांडली. त्यामुळे बजरंग दलावर फेसबुक बंदी होणार नसल्याचे सूचित झाले.
नागरिकांशी संबंधित माहितीच्या सुरक्षेबाबत माहिती-तंत्रज्ञानविषयक संसदीय स्थायी समितीने मोहन यांना पाचारण केले होते.
त्यानुसार, कॉंग्रेस नेते शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर मोहन उपस्थित राहिले. त्यावेळी त्यांच्याकडे थरूर आणि कॉंग्रेसचे सदस्य कार्ती चिदंबरम यांनी बजरंग दलाशी संबंधित मुद्द्यावर विचारणा केली. मात्र, फेसबुक बंदीसाठी बजरंग दलाच्या पोस्टमध्ये काही वावगे आढळले नाही, असे मोहन यांनी नमूद केले.
फेसबुकवरील काही पोस्टबाबत आक्षेप घेतले जात आहेत. बजरंग दलाच्या काही पोस्टवरही आक्षेप नोंदवण्यात आले. मात्र, आर्थिक कारणांमुळे आणि आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षाविषयक चिंतेमुळे फेसबुकने बजरंग दलावर बंदी घातली नाही, असे वृत्त नुकतेच वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले.
त्याचा आधार घेऊन मोहन यांच्याकडे फेसबुक बंदीबाबत विचारणा करण्यात आल्याचे समजते.