नवी दिल्ली – संरक्षणविषयक संसदीय समितीच्या बैठकीतून बुधवारी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि त्या पक्षाचे सदस्य तडकाफडकी बाहेर पडले. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याऐवजी सशस्त्र दलांच्या गणवेशाचा मुद्दा उपस्थित करून समितीचा वेळ वाया घालवला जात असल्याचा आक्षेप घेत त्यांनी बैठकीतून वॉकआऊट केले.
भाजपचे नेते ज्युअल ओराम यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीला विविध पक्षांचे सदस्य आणि संरक्षण दल प्रमुख बिपीन रावत उपस्थित होते. बैठकीत लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या गणवेशांच्या रंगाबाबत सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी अमेरिकेप्रमाणे तिन्ही दलांच्या गणवेशासाठीचा रंग समान असावा, अशी मागणी भाजपच्या एका सदस्याने केली. त्या चर्चेवर राहुल यांनी आक्षेप घेतला.
राजकीय नेतृत्वाने सशस्त्र दलांना कुठला गणवेश परिधान करावा ते सांगू नये. त्याचा निर्णय सशस्त्र दलांवरच सोपवला जावा. लडाखमध्ये चीनी सैनिकांसमोर उभे ठाकलेल्या भारतीय जवानांना सुसज्ज करण्याकडे राजकीय नेतृत्वाने लक्ष केंद्रित करावे. तसेच, शत्रूला मागे कसे पाठवता येईल याविषयीच्या रणनीतीवर विचार करावा, अशी भूमिका राहुल यांनी मांडली. त्यांना आणि कॉंग्रेस सदस्यांना प्रामुख्याने चीनी कुरापतींचा मुद्दा उपस्थित करायचा होता.
मात्र, राहुल यांना अधिक बोलण्याची परवानगी ओराम यांनी दिली नाही. राहुल यांनी मांडलेल्या भूमिकेवरून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगीही झाली. भलत्याच मुद्द्यावर चर्चा होत असल्याची नाराजी व्यक्त करत राहुल यांनी बैठकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासमवेत राजीव सातव आणि रेवंथ रेड्डी हे कॉंग्रेसचे सदस्यही बाहेर पडले.