संतोष घारे
चिनी ड्रॅगनचा विळखा संपूर्ण जगाला कोणत्या ना कोणत्या रूपाने पडला आहे. मग तो वस्तूंच्या रूपाने असो किंवा करोना संसर्गाच्या रूपाने असो. भारताच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास चीन हा भारताचा कधीही चांगला शेजारी राहिलेला नाही; परंतु चीनच्या वस्तूंनी भारताची बाजारपेठ काबीज केली आहे. अस्मितेच्या नावावर चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची कृती ही प्रत्यक्षात उतरणे हे सध्या शक्य नाही. कारण भारताची चीनवरील विविध गोष्टींची अवलंबिता अधिक असून ती नजिकच्या काळातही राहू शकते.
जानेवारी 2021 ते नोव्हेंबर 2021 दरम्यान भारत आणि चीन यांच्यात एकूण 8.57 लाख कोटी रुपयांचा व्यापार झाला आणि तो एक उच्चांक आहे. मागील वर्षी याच काळाची तुलना करता ही उलाढाल 46.4 टक्के अधिक आहे. यादरम्यान भारताने चीनकडून 6.59 लाख कोटी रुपयांचे विविध उत्पादने आयात केली आणि ती गेल्यावर्षीच्या तुलनेत 49 टक्के अधिक आहे. अर्थात या काळात चीनने देखील भारतातून विक्रमी आयात केली आहे. चीनने एकूण 1.98 लाख कोटी रुपयांची उत्पादने भारतातून आयात केली आणि ती गेल्यावर्षीच्या तुलनेत 38.5 टक्के अधिक आहे. असे असतानाही भारताची चीनबरोबर व्यापारी तूट वाढून ती 4.61 लाख कोटींवर पोहोचली आहे. तीदेखील उच्चांकी पातळीवर आहे.
भारत आणि चीन यांच्यात व्यापार वाढत आहे. दुसरीकडे लडाख आणि अरुणाचल भागात दोन्ही देशांतील तणाव कायम आहे. तरीही सध्याची स्थिती उभय देशातील उलाढाल पाहता द्विपक्षीय व्यापाराचे महत्त्व अधोरेखित होते. आज युद्धापेक्षा व्यापाराची गरज अधिक आहे. जर व्यापारी संबंध चांगले नाही राहिले तर देशाचे मोठे नुकसान होऊ शकते. यासाठी युद्ध लढण्याची गरज नाही. त्यामुळे बदललेल्या स्थितीकडे आश्चर्यचकित होऊन पाहू नये. भारत आजही आत्मनिर्भर नाही. चीनच्या उत्पादनावर भारतात बहिष्कार घालणे हे सर्वसामान्य नागरिकांनी उचललेले भावनात्मक पाऊल असू शकते. वास्तविक भारतीय बाजारपेठेवर चिनी मालाचे वर्चस्व आहे. भारताच्या ग्रामीण भागात चीनची उत्पादने पोहोचली आहेत.
कटिंगच्या दुकानात वापरण्यात येणारी चादर, कात्री, वस्तरा, मुलांची खेळणी, दिवाळीचे दिवे, सजावटीचे सामान, टीव्ही, लॅपटॉप, गावातील किराणा दुकानावर बहुतांश चिनी वस्तूंचाच बोलबाला आहे. अशावेळी आपण चिनी वस्तूंवर बहिष्कार कसा टाकू शकतो. भारतात घरगुती गरजा भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चिनी वस्तूंची आयात केली जात आहे. इलेक्ट्रॉनिक हार्डवेअरच्या बाजारात चीनचा भारतीय बाजारपेठेवर ताबा आहे. कोणत्याही देशाच्या निर्यातीतून मिळालेली रक्कम ही आयातीवरील खर्चापेक्षा अधिक असेल तर त्यास व्यापारी नफा असे म्हणता येईल. परंतु निर्यातीपेक्षा आयातीवर अधिक खर्च होत असेल तर त्यास व्यापारी तूट असेच म्हणावे लागेल.
चीनबरोबर भारताची व्यापारी तूट ही वाढतच चालली आहे. भारत चीनकडून विविध उत्पादनांची आयात अधिक प्रमाणात करत असून निर्यातीचे प्रमाण तुलनेने कमीच राहिले आहे. 2014 मध्ये भारत चीनबरोबर व्यापारी तूट ही 3.36 लाख कोटी रुपये होती, ती 2021 मध्ये 4.61 लाख कोटींवर पोहोचली आहे. यावरून आपण कितीही चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची घोषणा केली तरी ते प्रत्यक्षात येणे कठीण आहे.
आजही आणि आगामी काळातही घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी चीनच्या वस्तूंवर अवलंबून राहावे लागणार आहे. आजही आपण अनेक उत्पादनासाठी चीनच्या कच्च्या मालाची आयात करतो आणि आगामी काळातही हे अवलंबित्व कायम राहण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष 2014-15 ते आर्थिक वर्ष 2019-20 या काळात भारत आणि चीन यांच्यात झालेल्या बाजाराचे आकडे पाहिल्यास भारताने चीनला कमी मूल्यांचे कच्चे उत्पादन अधिक पाठवले आहे, हे दिसून येते. त्याचवेळी निर्गुंतवणुकीशी निगडीत उत्पादनांची चीनकडून आयात केली जात आहे.
भारताकडून चीनने प्रामुख्याने कच्चे पोलाद, पेट्रोलियम आधारित इंधन, कार्बिनिक रसायन, अशुद्ध तांबे, कॉटनयार्न आदींची आयात केली आहे. खाद्यपदार्थात मासे, समुद्री खाद्यपदार्थ, वनस्पती तेल आदी गोष्टी भारत चीनला निर्यात करत आहे. तसेच भारत ग्रेनाइटच्या ब्लॉक व रिअल इस्टेटमध्ये वापरण्यात येणारे दगड आणि कच्चा कापूसही निर्यात केला जात आहे.
चीनमध्ये ऑटोमोबाइल, मोबाइल आणि संगणकाच्या सुट्या भागांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. चीनकडून भारतात आयात होणाऱ्या वस्तूंत इलेक्ट्रॉनिक्स 20.6 टक्के, मशिनरी 13.4 टक्के,
ऑर्गनिक केमिकल्स 8.6 टक्के, प्लॅस्टिक उत्पादन 2.7 टक्के याचा समावेश आहे. त्याचवेळी भारतातून चीनला निर्यात होणाऱ्या वस्तूूत ऑर्गनिक केमिकल्सचे 3.2 टक्के, सूती कपड्यांचे 1.8 टक्के योगदान आहे. इलेक्ट्रिकल मशिनरी, मेकॅनिकल उपकरण, ऑर्गेनिक केमिकल, प्लॅस्टिक, ऑप्टिकल सर्जिकल उपकरणांची चीनकडून सर्वाधिक आयात केली जाते. ही आयात भारताच्या एकूण आयातीच्या 28 टक्के आहे. भारतात चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची गोष्ट केली जात असली तरी भारत हा कच्च्या मालासाठी आणि सुट्या भागांसाठी चीनवर अवलंबून आहे. एवढेच नाही तर अनेक तयार उत्पादनासाठी चीनवरच अवलंबून राहावे लागते. अशावेळी चायनीज उत्पादनावर बहिष्कार घालण्याची भाषा करण्याऐवजी “मेड इन इंडिया’ वस्तूंची संख्या वाढवण्यावर भर द्यायला हवा.