केडगावात रोपांसह फळेही कोमेजली ः शेतकरी चिंतेत
केडगाव- येथील परिसरात परतीच्या अतिपावसाचा फटका शेतीत असणाऱ्या सर्वच पिकांबरोबर टोमॅटो पिकालाही मोठ्या प्रमाणात बसला असून, या पिकाची पाने आणि फळे कोमेजून गेली आहेत.
हिवाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला असला तरी थंडीची चाहूल कमीच जाणवत आहे. चालू वर्षी केडगाव (ता. दौंड) आणि परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे शेतीत असणाऱ्या सर्वच पिकांना मोठा फटका बसला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. परतीचा पाऊस अवास्तव कोसळल्यामुळे अनेक ठिकाणी शेतांत अजूनही पाणी साचलेले आहे. गेल्या वर्षी या परिसरात दुष्काळी स्थिती होती, त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. दुष्काळाशी समस्या करताना येथील शेतकरी मेटाकुटीला आला होता, तर चालूवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर आभाळ कोसळले आहे. सरकारने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे धोरण अवलंबून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी मिळणारी मदत नेमकी किती आणि त्यामुळे पिकांसाठी झालेला खचर तरी भरून निघणार आहे का, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.