इस्लामाबाद – पाकिस्तानमधील सर्व राजकीय पक्षांनी देशासमोरील गंभीर समस्यांचा विचार करून आपापसातील मतभेद बाजूला ठेवावेत, असे आवाहन अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी केले आहे. पाकिस्तानसमोर आर्थिक आणि दहशतवादी कारवायांमुळे निर्माण झालेले संकट अधिकच गंभीर झाले असल्याच्या पार्श्वभुमीर झरदारी यांनी हे आवाहन केले आहे.
८४ व्या पाकिस्तान दिनाच्या निमित्ताने झालेल्या लष्कराच्या संचलनाच्या सोहळ्याच्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. १९४० साली आजच्याच दिवशी झालेल्या लाहोर ठरावामध्ये मुस्लिमांसाठीच्या स्वतंत्र देशाच्या निर्मितीसाठीचा आराखडा करण्याचे निश्चित झाले होते. पाकिस्तान दिनाच्या या समारंभाला सौदी अरेबियाचे संरक्षण मंत्री खलिद बिन सलमान हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
समारंभादरम्यान पाकिस्तानच्या लष्कराच्या तिन्ही दलांचे संचलन झाले. यावेळी झरदारी यांनी देशातील राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून देशाचा विकास आणि समृद्धीसाठी काम करण्याचे आवाहन देखील केले. निवडणुकीतील गैरप्रकारांच्या मुद्यावरून पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाने देशव्यापी आंदोलन सुरू केल्याच्या अनुषंगाने ते बोलत होते.
देशात लोकशाही मार्गाने सरकार स्थापन झाले आहे. आता देशासमोरील सर्व आव्हानांचा मुकाबला करणे ही आपली जबाबदारी आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तानचे लष्कर सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी समर्थ आहे. दहशतवादाचा यशस्वीपणे सामना केला जातो आहे, हे सर्व जग बघते आहे, असेही झरदारी म्हणाले.
गाझामध्ये त्वरित युद्धविराम लागू केला जावा, अशी मागणीही झरदारी यांनी केली. आर्थिक अडचणीच्या काळात पाकिस्तानला मदत केल्याबद्दल चीन, तुर्कीये, सौदी अरेबिया आणि युएईचे आभार देखील झरदारी यांनी मानले आहेत.