पुणे – अर्थमंत्रालयाने कंपनी करात मोठी कपात करून आता नऊ दिवस उलटले आहेत. मात्र, काही तुरळक कंपन्या सोडल्या तर इतर कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या दरात कपात जाहीर केलेली नाही. ती केली तर कंपन्यांना विक्री वाढण्यास मदत होईल, असे समजले जाते. एका मोठ्या खासगी बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले, की कंपन्यांनी शक्य तितक्या लवकर दरकपात जाहीर केल्यानंतर ग्राहकांची मानसिकता सकारात्मक होण्यास मदत होईल. कर कपातीमुळे सरकारचा महसूल कमी होऊन तूट वाढेल या शक्यतेचा या अधिकाऱ्यांनी इन्कार केला.
एअर इंडियासह बऱ्याच सरकारी कंपन्यांची निर्गुंतवणूक करून ही तूट सरकार भरून काढू शकते असे त्यांनी सांगितले. कंपनी करारातील कपातीमुळे कंपन्यांचा नफा 10 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. हा सर्व नफा कंपन्यांनी स्वतःकडे किंवा भागधारकाकडे देण्याऐवजी यातील काही भाग ग्राहकांना दर कपातीच्या माध्यमातून देण्याची गरज आहे. काही कंपन्यांनी हे काम सुरू केल्यानंतर इतर कंपन्यांनाही स्पर्धेमुळे तसे करावे लागेल. केंद्र सरकारने जीएसटीमध्ये बरीच सुसूत्रता आणल्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांना होण्याची गरज आहे. हॉटेल आणि खाद्य व्यवसायाचे कर कमी झाल्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. भारताची स्थूल अर्थव्यवस्था बळकट आहे. त्यामुळे तूटीची चिंता करण्याची फारशी गरज नाही.
वाहन उत्पादन कंपन्यांनी काही प्रमाणात दर कपात केलेली आहे, मात्र इतर कंपन्या याबाबत आकडेमोड करीत असल्याचे दिसून येत आहे. दर कपातीसाठी ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कारण या कंपन्यांच्या उत्पादनांचे दर फारसे नसतात.
त्याच बरोबर आता कर कमी झाल्यामुळे भारतातील कर इतर देशाच्या बरोबर झालेला आहे. त्यामुळे त्या कंपन्यांनी उत्पादनाचे दर कमी करून निर्यात वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कर कपातीमुळे आता भारतातून इतर तर देशात स्थलांतरित होणारे उद्योग परत येऊ लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतातील कंपनी कर जास्त असल्यामुळे भारतात येणारे किंवा आलेले उद्योग व्हिएतनाम, कंबोडिया, थायलंड, इंडोनेशिया, फिलिपाइन्स इत्यादी देशाकडे वळत होते. विशेषतः वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योग या देशाकडे जात असल्यामुळे भारताच्या निर्यातीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत होता.