पुणे- इयत्ता अकरावीसाठीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झालेली आहे. पहिल्याच दिवशी राज्यातील 97 हजार 447 विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केल्री. अर्ज नोंदणीस विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सर्वाधिक अर्ज नोंदणी मुंबई तर सर्वांत कमी नोंदणी अमरावतीतून झाली आहे.
दरवर्षीप्रमाणेच यंदाही अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धत अवलंब करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून पहिल्या प्रवेश फेरीचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आलेले आहे. दरम्यान शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते अकरावी प्रवेशाच्या वेबसाईटचे ऑनलाइनद्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, सहसचिव राजेंद्र पवार राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांनीही यात सहभाग घेतला होता. शिक्षणमंत्र्यानी सर्व अधिकाऱ्यांकडून प्रवेश प्रक्रियेच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रवेश प्रक्रियेची वेबसाईट क्रॅश होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यावर आवश्यक त्या क्षमतेचे सर्व्हर उपलब्ध करुन देण्यात आलेले असल्याने वेबसाइट कायम सुरळीत सुरु राहिल, अशी शाश्वती अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे.
अकरावीच्या प्रवेश अर्जाचा भाग-1 भरण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध झालेली आहे. विद्यार्थ्यांनी लॉगिन आयडी व पासवर्ड जनरेट करुन अर्ज भरण्यास सुरुवातही केलेली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरळीतपणे सुरु झाली आलेली असून काहीच तक्रारी दाखल झालेल्या नाहीत, अशी माहिती शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे.