पुणे – राज्यात कोकण वगळता इतर ठिकाणी पावसाने उघडीप दिली असून, पुढील आठवडाभर पावसाचा जोर कमी राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी (दि.31) पुण्यासहित राज्यात बहुतांश ठिकाणी तुरळक पावसाची नोंद हवामान विभागाने केली आहे.
राज्यात असलेल्या हवेच्या चक्रीय स्थितीच्या प्रभावामुळे गेल्या दोन दिवसांपासून कोकणातील पालघर आणि विदर्भातील भंडारा या जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागांमध्ये पूरस्थिती उद्भवली आहे. मात्र, येत्या काही दिवसांत पावसासाठी अनुकूल वातावरण नसल्याने पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याचा इशारा हवामान विभागातर्फे नोंदविण्यात देण्यात आला आहे.
मान्सूनचा ट्रफ सध्या हिमालयाच्या पायथ्याशी आहे. तसेच दक्षिण पश्चिम अरबी समुद्रातून जोरदार वारे वाहणार आहेत. याबरोबरच तामिळनाडून किनारपट्टीवर असलेला द्रोणीय स्थितीचा प्रभाव कायम आहे. मात्र, राज्यात कोणत्याही स्थितीचा प्रभाव नसल्यामुळे पाऊस कमी झाला असून कोकण वगळता इतर भागांमध्ये पावसाची शक्यता कमीच असल्याचे दिसून येत आहे.