अभाविपचे तहसीलदारांना निवेदन
बारामती (प्रतिनिधी) – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे, याबाबतचे निवेदन तहसीलदार विजय पाटील यांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्रात परतीच्या पावसाने प्रचंड थैमान घातले आहे. यामुळे ग्रामीण व शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. समाजातील प्रत्येक घटक या अतिवृष्टीमुळे बाधित झालेला आहे इतकेच नव्हे तर शेतकरीसुद्धा आर्थिक विवंचनेत सापडलेला आह. विद्यार्थी देखील संकटाला तोंड देत आहे, म्हणून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी अभाविप बारामती शाखेच्या शिष्टमंडळाने केली आहे.
महाराष्ट्रात सर्वदूर अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे तरी यावर्षी विद्यार्थ्यांची सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे. बसपास मोफत द्यावेत. शहराच्या ठिकाणी निशुल्क खानावळीची व्यवस्था करण्यात यावी. महाविद्यालयातर्फे कुठल्याही प्रकारचे शुल्क भरण्याची सक्ती करण्यात येणार नाही यासाठीच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात याव्या. विद्यापीठातील वसतिगृहाचे शुल्क माफ करण्यात यावे, अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन विद्यार्थ्यांनी दिले आहे.
सरकार दरबारी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार व्हावा व त्यावर अंमलबजावणी करण्यात यावी असे जिल्हा संयोजक वैभव सोलंकर यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी शहर सहमंत्री समीर मारकड, बाळासाहेब सोलनकर, सुजित सोरटे ,संतोष हुलगे व अभाविप बारामती जिल्हा विस्तारक शशिकांत टिंगरे, व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.