पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्नित काही विधी अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांतील तब्बल २०० विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास नियमानुसार एक वर्षाचा ब्रेक घ्यावा लागतो. मात्र, काही महाविद्यालयांनी नियमाला हरताळ फासून २०० अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरल्याची बाब विद्यापीठ परीक्षा विभागाच्या संगणक प्रणालीतून उघडकीस आली. २०० विद्यार्थी प्रवेशासाठी अपात्र ठरले असून, त्यांचे परीक्षा अर्ज रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने घेतला आहे.
विधी पदवीच्या तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या एखादा विद्यार्थी पहिल्या वर्षात दोन विषयांत अनुत्तीर्ण झाला, द्वितीय वर्षात त्याला “एटीकेटी’ मिळाली. पहिले वर्ष सर्व विषयात उत्तीर्ण नसल्याने या विद्यार्थ्यास तिसऱ्या वर्षात प्रवेश मिळत नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश मिळावा आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी एक विशेष बाब म्हणून आॅक्टोबर २०२३ मध्ये परीक्षेला बसण्याची संधी देण्याचा निर्णय विद्यापीठाच्या विद्या परिषदेने घेतला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला होता.
दरम्यान, विधी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात पूर्णपणे विद्यार्थी अनुत्तीर्ण ठरले आहेत. अशा विद्यार्थ्यांचे वर्ष वाया गेले आहे. अशा अपात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन ऑक्टोबर 2023 मधील परीक्षांच्या निकालानंतर त्यांचे परीक्षा अर्ज ते पात्र आहेत, असे भासवून विद्यापीठाची दिशाभूल केली. या महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागास विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरण्याची विनंती केली. त्यानुसार परीक्षा अर्ज स्वीकारण्यात आले.
या सर्व अर्जांची परीक्षा विभागाच्या संगणकीय प्रणालीतून पडताळणी केली असता, तब्बल २०० अपात्र विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर परीक्षा विभागाने सर्व अर्जांची तपासणी केली. हे सर्व नियमबाह्य पद्धतीने झाल्याचे सिद्ध होताच हे परीक्षा अर्ज संगणकीय प्रणालीतून काढल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. महेश काकडे यांनी दिली.
विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची विसंगत माहिती देउन त्यांची दिशाभूल काही महाविद्यालयांनी केली असल्याचे दिसून येत आहे. या विद्यार्थ्यांना विद्यापीठामध्ये पाठवून दबावतंत्राचा वापर केला जात आहे. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. डाॅ. महेश काकडे, संचालक : परीक्षा व मूल्यमांपन मंडळ