पालिकेच्या कर्मचाऱ्याच्या तत्परतेने वाचले प्राण
पुणे : लकडी पूलाच्या खालील बाजूस असलेल्या शंकर मंदीराच्या बाजूला नदीपात्रात दलदलीत अडकलेल्या 75 वर्षीय माजी सैनिकाला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने जीवदान मिळाले.
सुमारे साडेचार फूट खोल दलदलीत ही व्यक्ती अडकली होती. संध्याकाळी नदीपात्रातील रस्त्याने फिरायला गेलेल्या या कर्मचाऱ्यांना अंधारात अडकलेल्या या वयोवृध्द सैनिकाचा विव्हळण्याचा आवाज आल्याने त्यांनी तत्काळ आवाजाच्या दिशेने शोध घेततो. व त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला.
पालिकेच्या कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी सफाई सेवक धनंजय आयवळे, कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे मुकादम वैजीनाथ गायकवाड आणि सफाई कर्मचारी अतुल गायकवाड अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
शुक्रवारी सायकांळी साडेसहाच्या सुमारास हे तीनही कर्मचारी कार्यालयातील काम संपवून नदीपात्रच्या रस्त्याने फिरण्यासाठी आले होते, यावेळी लकडी पुलाच्या खालील बाजूस असलेल्या नाल्याच्या झुडपात त्यांना एक ज्येष्ठ व्यक्ती विव्हळत असल्याचा आवाज आला. मात्र, मुख्य रस्त्यापासून सुमारे तीन ते चार मीटर आत मधील बाजूने हा आवाज येत असल्याने त्यांनी झुडपे बाजूला करून आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथे दलदल असल्याने जाता येत नव्हते अशा स्थितीत, अहिवळे आणि गायकवाड यांनी दलदलीत उतरण्याचा प्रयत्न करत त्या वृध्द व्यक्तीला आवाज देऊन बाहेर येण्याच्या सूचना केल्या. मात्र, त्या वृध्द व्यक्तीला बाहेर येता येत नव्हते. तसेच या दोघांनाही पुढे जाता येत नव्हते.
त्यातच, अंधार मोठया प्रमाणात असल्याने मोबाईलच्या बॅटरीमध्ये ते हे काम करत होते. मात्र, त्यांना या व्यक्तीस बाहेर काढता येत नसल्याने त्यांनी कसबा अग्नीशमन केंद्राला मदत मागितली. त्यानंतर अग्निशमनदल तसेच पोलीसही मदतीला आले.
त्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी तांडेल अनिल करडे, फायरमन ज्ञानेश्वर गायकवाड, हरिष बुंदेले, निलेश कर्णे, गोरख गव्हाने यांनी अवघ्या दहा मिनिटात वृध्द व्यक्तीला दलदलीतून स्ट्रेचर वरून बाहेर काढले. तो पर्यंत या कर्मचाऱ्यांनी तातडीनं 108 ची रूग्णवाहीकाही बोलावून घेतली होती. त्यानंतर रूग्णवाहिकेत असलेल्या डॉक्टरांनी या वृध्द व्यक्तीच्या तपासणी करण्यात आली. यावेळी या वृध्दाने आपण माजी सैनिक असल्याचे डॉक्टर तसेच पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या वृध्द व्यक्तीस ससून रूग्णालयात उपचारासाठी नेले असल्याचे गायकवाड यांनी प्रभातशी बोलताना सांगितले.