Delhi Police – तीन जणांची हत्या करून स्वत:च्याच मृत्त्यूचा (Death) बनाव करणाऱ्या नौदलाच्या 60 वर्षीय माजी (Ex-Navy Man) कर्मचाऱ्याला 20 वर्षांनंतर दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) गुन्हा शाखेने जेरबंद केले आहे.
त्याने आपला एक नातेवाईक आणि दोन मजुर अशी एकूण तीन जणांची हत्या केली होती. बालेश कुमार असे या आरोपीचे नाव आहे. त्याला नजफगढमधील एका घरातून अटक करण्यात आली जिथे तो नाव बदलून अमन सिंग या नावाने राहात होता.
2004 मध्ये दिल्लीच्या बवाना भागात पैशाच्या कारणावरून त्याने आपला मेहुणा राजेश उर्फ खुशीराम याची हत्या केली तेव्हा बालेश 40 वर्षांचा होता. राजेशच्या पत्नीशी त्याचे अवैध संबंध होते.
2004 मध्ये पोलिसांनी बालेशचा भाऊ सुंदर लाल याला अटक केली, जो राजेशच्या हत्येतही सामील होता, तथापि, बालेश त्यांना चकवा देण्यात यशस्वी झाला. त्यावेळी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारा बालेश ट्रकमधून राजस्थानला पळून गेला.
तेथे त्याने आपला ट्रक पेटवून दिला आणि त्याच्या दोन कामगारांना जाळून ठार केले. दोन मृतांमध्ये बालेश हाही असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली.
त्यामुळे बालेश मृत घोषित करण्यात आला होता. राजस्थान पोलिसांनी मुख्य संशयित मृत झाल्याचे मानून प्रकरण बंद केले. मृत्यूचा बनाव केल्यानंतर, बालेश पंजाबला पळून गेला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने त्याने बनावट ओळख पुरावा मिळवून त्याने त्याचे नाव बदलून अमन सिंग असे ठेवले.
तो आपल्या पत्नीच्या संपर्कात राहिला आणि भारतीय नौदलाकडून विमा हक्काचे फायदे आणि पेन्शन तिच्याकडे हस्तांतरित करण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर बालेश आपल्या कुटुंबासह दिल्लीच्या नजफगढ भागात जाऊन राहात होता.
गुप्तचरांकडून ही माहिती मिळाल्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आले. अटक झाली तेव्हा बालेश नजफगडमध्ये प्रॉपर्टी डीलर म्हणून काम करत होता.