नवी दिल्ली – दिल्लीच्या सीमांवर सुरू असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्यांच्या संख्येबाबात मतभिन्नता व्यक्त करण्यात येत आहे. हरियाणा पोलिसांच्या मते अद्याप 40 हजार आंदोलक घटनास्थळावर ठाण मांडून आहेत.गेले चार महिने हे आंदोलन सुरू असले तरी केंद्र सरकार त्यात तोडगा काढण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नाही. मात्र, हरियाणा पोलिसातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मतानुसार या 40 हजार आंदोलकांचा निर्धार कायम आहे.
या आंदोलकांना रोखण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीने निमलष्करी दलाच्या 25 कंपन्या आंदोलन स्थळाजवळ ठाण मांडून आहेत. त्याचवेळी शेतकऱ्यांकडून हे आंदोलन सुरू ठेवण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्याचे प्रयत्न हरियाणात सुरू आहेत. पोलिसांच्या अंदाजानुसार 18 ते 19 हजार आंदोलक सिंघू सीमेवर आहेत तर 20 ते 22 हजार आंदोलकांनी टीकरी सीमेवर ठाण मांडले आहे. मात्र शेतकरी नेत्यांनी पोलिसांच्या अनुमानापेक्षा प्रत्यक्षात आंदोलकांची संख्या खुप मोठी असल्याचे म्हटले आहे.
हरियाणा पोलिसांच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, 26 जानेवारीच्या तुलनेत आंदोलकांची गर्दी ओसरली आहे. मात्र तरीही मोठ्या संख्येने तेथे आंदोलक उपस्थित आहेत. सीमेवरील त्यांच्या संख्येकडे आम्ही दूर्लक्ष करू शकत नाही.
शेतकरी नेत्यांन िदिलेल्या महितीनुसार, 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर परेड नंतर आपल्याला परत गावी जायचे आहे, असे शेतकऱ्यांना वाटले. त्यामुळे काही प्र्रमाणात आंदोलक परतले. पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, जत्रेला जावे त्या प्रमाणे लोक आंदोलनस्थळाकडे येत होते. मात्र आता या बघ्यांची संख्या कमी झाली आहे. आता येणारे जाणारे कमी झाले असले तरी सध्या असणारे आंदोलक हे ठाम निर्धार असणारे आंदोलक आहेत.
उत्तर प्रदेश पोलिसांनी 27 जानेवारीला गाझीपूर सीमेवरून आंदोलकांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. त्याची तीव्र प्रतिक्रिया हरियाणात उमटली. शेतकरी मोठ्या प्रमाणात अस्वस्थ झाले. त्या घटनेनंतर सर्वत्र किसान पंचायतंचे आयोजन करण्यात आले. गाझीपूर सीमेवर शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या डोळ्यात आलेल्या अश्रुंनी हे आंदोलन पुन्हा अधिक तीव्र बनले. त्यानंतर 15 दिवस हरियाणातील वातावरण प्रक्षोभक होते. मात्र आता हळूहळू आंदोलन संथ होत आहे, असे निरीक्षणही अन्य एका अधिकाऱ्याने नोंदवले.
हे आंदोलन ज्यावेळी परमोच्च सीमेवर होते त्यावेळी 26 जानेवारील निमलष्करी दलांच्या 45 कंपन्या तैनात करण्यात आल्या होत्या. मात्र, पाच राज्यांत निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यातील 25 कंपन्या तेथून हटवण्यात आल्या. बहुसंख्य दले जी जझ्झर आणि सोनिपत जिल्ह्यात तैनात करण्यात आली आहेत.
दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांनी हे आंदोलन दीर्घकाळ सुरू ठेवण्यासाठी आपल्या आंदोलनाच्या पध्दतीत बदल केला आहे. टोल प्लाझावर आंदोलन करुन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांना मोफत रस्ता मिळवून देतात. त्याचवेळी शेजारच्या 15 गावातील शेतकरी नियमितपणे आंदोलनात येतील, याची काळजी घेण्यात आली आहे.
गावपातळीवर समिती स्थापन करून भविष्यात दबाव आणण्याची रणनीती शेतकऱ्यांनी आखली आहे. त्याचबरोबर नोकरदार आणि मजूर वर्गाकडूनही आंदोलनाला पाठींबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा प्रत्यय शुक्रवारी जिंद येथे झालेल्या आंदोलनात आला. त्यात अनेक नोकरदार आणि मजूर सहभागी झाले होते.