दिवेतील शेतकरी सुनील झेंडे बागेतून लखपती
निखील जगताप
बेलसर : जागतिक बाजारपेठेमध्ये पुरंदरच्या अंजीरला मिळालेले स्थान पाहता पुरंदरच्या अंजीर शेतकऱ्यांचे सध्या सुगीचे दिवस सुरू आहेत. पुरंदरमधील दिवे येथील दरामधील शेतकरी सुनील झेंडे यांनी त्यांच्या एकूण 200 अंजीरांच्या झाडांमधून चार महिन्यांच्या कालावधीत निव्वळ 9 लाख रुपये नफा मिळवला आहे. त्यामुळे त्यांचे विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.
पुरंदर तालुक्यातील दिवे, सोनोरी, वाघापूर, राजेवाडी, गुऱ्होळी तसेच इतर भागातही अंजिराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सद्यस्थितीला खट्टा बहार सुरू असताना अंजीर पिकाची काढणी सुरू आहे. सध्या बाजार भाव चांगला मिळत असल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक नफा मिळत आहे. अंजिराच्या एका पेटीमध्ये बारा फळे तर चार पेट्या मिळून एक बॉक्स तयार होतो. बाजारपेठांमध्ये पुरंदरच्या अंजिराला विशेष मागणी असल्याने जवळपास 300 ते 400 रुपये प्रति बॉक्स बाजार भाव पुरंदरच्या अंजिराला मिळत आहे.
सद्यस्थितीला खट्टा बहार सुरू आहे. खट्ट्याबहाराचे नियोजन दि. 1 जूनपासून सुरुवात होते. एक जूनपूर्वी अंजीर बागेस शेणखत व ईतर खतांच्या माध्यमातून बेसल डोस भरला. जूनला पहिले पाणी बागात दिले गेले. तर तिथून पुढे 45 दिवसानंतर दुडी निघण्यास सुरुवात झाली. तत्पूर्वी किमान दहा दिवसांनी बुरशीनाशक आणि कीटकनाशक यांची फवारणी करून एकात्मिक कीड नियोजन करण्यात आले.
फलधारणेनंतर राज्यसह पुरंदर तालुक्यामध्ये यावेळी पावसाने हजेरी लावली परंतु योग्य प्रकारे फवारणी करून झेंडे यांनी आपली अंजीर बाग वाचवले त्यामुळे केलेल्या कष्टाचे चीज त्यांना आज मिळाले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे पुरंदर तालुक्यामध्ये आदर्शवत अंजीर उत्पादन केल्यामुळे विविध अधिकारी व शेतकरी त्यांना प्रोत्साहित करून त्यांच्या बागेत भेटी देत आहेत.
19 वर्षांनंतरही गोडी कायम
दिवे येथील सुनील झेंडे यांची अंजिराची 200 झाडे आहेत. त्यापैकी 50 झाडे 19 वर्षांची व 150 झाडे पाच वर्षांची आहेत. जुना बाग असला तरी देखील अद्याप तो बाग झेंडे यांना चांगले व गुणवत्तापूर्ण उत्पादन देत आहे. झेंडे यांनी 19 वर्षे अत्यंत योग्य प्रकारे व निगराणीमध्ये बाग वाढविला आहे. त्यामुळे 19 वर्षे उलटून देखील उत्तम गुणवत्ता आणि गोडी चांगली राखण्यास झेंडे यशस्वी झाले आहेत.
…तर 10 ते 12 लाख मिळतील
झेंडे यांच्या अंजीर बागेमध्ये प्रत्येक झाडावर अंदाजे 2 हजार ते 2500 फळे आहेत तर झेंडे यांच्या अंदाजानुसार उत्पादन खर्च वजा जाता नऊ लाख रुपये निवड नफा शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. बहार पूर्ण होतातच अंदाजे 10 ते 12 लाख रुपये उत्पन्न मिळू शकते तर त्यापैकी अंदाजे तीन लाख रुपये खर्च वजा जाता हा नफा अगदी कमी कालावधीमध्ये मिळत असल्याने शेतकरी अंजीर बागेबद्दल समाधान व्यक्त करीत आहे.
++++++++++
शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्वक शेती करावी. शेतीसाठी कोणत्याही प्रकारच्या शिक्षणाची आवश्यकता नसत; परंतु अभ्यासपूर्वक व चौकस बुद्धीने शेती केल्यास शेती ही नक्कीच सरकारी नोकरी पेक्षा सरस ठरू शकते. व नवीन युवकांनी अभ्यासपूर्वक शेतीत उतरून शेती जागतिक पातळीवर पोहोचवावी.
-सुनिल झेंडे, अंजीर उत्पादक शेतकरी