नारायणगाव -राज्यातील तमाशासह लोककलावंत यांची गौरवशाली परंपरा जतन करण्यासाठी व लोककलावंतांना जगविण्यासाठी तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर लोककला आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गावोगावच्या यात्रा-उत्सवांना प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या यात्रा-उत्सवांमध्ये कला सादर करणाऱ्या कलावंतांची परवड झाली आहे. लोककला, कलावंत जगविण्यासाठी कायमस्वरूपी तरतूद करण्याची गरज आहे. याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेने डॉ. कोल्हे यांच्याकडे मागणी केली होती.
तमाशा परिषदेच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन डॉ. कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर लोककला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी अशी मागणी केली आहे.