नवी दिल्ली : दिल्लीतील धोकादायक प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी इथल्या राज्य सरकारने तिथे वाहनांसाठी आजपासून ‘सम-विषम’ व्यवस्था लागू केली आहे. दिल्लीत सध्या प्रचंड प्रदूषण असून तिथे आरोग्यविषयक आणीबाणीही लागू करण्यात आली आहे. यातून आपात्कालीन व्यवस्थेतील वाहने आणि महिला चालक असलेली वाहने वगळता कोणालाच सूट देण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सायकलवरुन घरातून आपल्या कार्यालयाला जाणे पसंत केले. त्यांच्याबरोबर सहायक कर्मचारीही सायकलवर गेले.
धोकादायक स्तरावर पोहोचलेल्या प्रदूषणामुळे दिल्लीत आजपासून सम-विषम योजना लागू केली जाणार आहे. या अंतर्गत सोमवारी दिल्लीत ज्या वाहनांच्या अखेरीस 0,2,4,6,8 हा क्रमांक असेल. तीच वाहने दिल्लीतील रस्त्यावर धावतील. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चार हजार रुपयांचा दंड करण्यात येईल.
सम-विषमची योजना सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लागू राहिल. सम-विषममधून रविवार वगळण्यात आला आहे. यावेळीही सम-विषम योजनेतून महिलांना सूट देण्यात आली आहे. कोणतेही वाहन चालवत असलेल्या महिलेला या सम-विषम योजनेतून सूट मिळेल. या वाहनात पुरुष प्रवासी नसला पाहिजे ही अट आहे. महिलांबरोबर 12 वर्षां पर्यंतच्या मुलांना सूट मिळेल. दुचाकी, आपात्कालीन सेवा देणारी वाहने म्हणजे एम्ब्युलन्स, अग्निशामक दलाचा या योजनेत समावश करण्यात आलेला नाही.