पुण्याला पाण्यासाठी मे 2020 उजाडणार
पुणे – शहराच्या पूर्व भागाची पाणीसमस्या सोडविण्यासाठी महापालिकेकडून भामा-आसखेड धरणातून अडीच टीएमसी पाणी उचलण्यात येणार आहे. या योजनेचे काम डिसेंबर 2019 अखेर पूर्ण करण्याचे आदेश राज्य शासनाने महापालिकेस दिले असले तरी, हे काम पूर्ण होण्यास मे 2020 उजाडणार असल्याचे समोर आले आहे. या योजनेसाठीच्या जलवाहिनीचे 3 किलोमीटरचे काम अद्यापही शिल्लक असून जॅकवेलचे कामही संथगतीने सुरू आहे. त्यामुळे शासनाने निश्चित केलेली डेडलाइनही हुकणार आहे.
नगररस्ता परिसरासह शहराच्या पूर्व भागाला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना वरदान ठरणार आहे. तब्बल 400 कोटींच्या घरात या योजनेचा खर्च गेला आहे. 2013-14 मध्ये सुरू झालेल्या या योजनेचे काम 2016 मध्ये पूर्ण होणे अपेक्षीत होते. मात्र, प्रकल्पग्रस्तांनी विरोध करत वेळोवेळी केलेल्या आंदोलनांमुळे हा प्रकल्प जवळपास 3 वर्षे रखडला आहे. त्यानंतर आता शासनाने प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा तिढा सोडविला असला तरी, योजनेच्या जलवाहिनीचे 3 किलोमीटरचे काम अद्यापही शिल्लक आहे. हे काम वादाच्या जागेतील असून त्यावर अद्यापही महापालिकेस तोडगा काढता आलेला नाही.
त्यातच विधानसभा निवडणुकीत कामाचा फटका बसू नये म्हणून काही दिवस या योजनेच्या जॅकवेलचे कामही बंद ठेवले होते. त्यातच शासनाने सप्टेंबर 2019 मध्ये महापालिकेस पत्र पाठवून या योजनेचे काम कोणत्याही स्थितीत 31 डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश पालिकेस दिले आहे. मात्र, नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोनच महिन्यांत हे काम पूर्ण करणे अशक्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
3 किलोमीटरच्या जलवाहिनीचा तिढा
योजनेच्या जॅकवेलचे काम पूर्ण झाले असले तरी अद्यापही जवळपास 3 किलोमीटरची जलवाहिनी टाकणे बाकी आहे. हे सर्व अंतर वादाच्या जागेवर आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील 1 किलोमीटरच्या जलवाहिनीचाही यात समावेश आहे. ही जलवाहिनी ज्या रस्त्याच्या कडेने जाणार आहे. तो महापालिकेचा डीपी रस्ता आहे. तसेच, त्याचे रुंदीकरण होणार आहे. रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू असली तरी जागा ताब्यात आलेली नाही.
तसेच, ज्या शेतकऱ्याची ही जागा आहे, ते आपल्या जागेतून जलवाहिनी टाकून देण्यास तयार नाहीत. याशिवाय, जिल्हा प्रशासनाने प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन योग्य पद्धतीने झाल्याशिवाय, जलवाहिनीच्या शेवटच्या 1 किलोमीटरचे काम करणार नाही, असे लेखी दिले आहे. तर, पुनर्वसनाबाबत अद्यापही शेतकरी नाराज आहेत. त्यामुळे हे 1 किलोमीट्रचे कामही अद्याप सुरू झालेले नाहीत. तर वेगवेगळ्या ठिकाणीही इतर काही कारणास्तव 1 किलोमीटरच्या जलवाहिनीचे काम थांबून आहे.