करोना महासाथीमुळे जीवनाचे गणित बिघडले आहे. वर्षभरात भारतच नाही तर जगाचे चित्र बदलले आहे. एरव्ही आपापल्या कामात मश्गुल राहणाऱ्या जगाला करोनाने सामाजिकदृष्ट्या “आयसोलेट’ केले आहे. आपण प्रथमच विरोधाभास असलेल्या स्थितीत राहात आहोत. आयुष्य थांबल्यासारखे वाटत आहे, परंतु जबाबदारीमुळे धावपळ मात्र कायम आहे.
करोनाचे परिणाम सर्वच क्षेत्रांवर होण्याबरोबरच मानसिक, शारीरिक स्थितीवरही झाला आहे. यातून एकप्रकारचा थकवा निर्माण झाला आहे. करोना महासाथीने निर्माण झालेल्या थकव्याला “पॅंडेमिक फटिग’ असे म्हणतात. करोनासारख्या महासाथीपासून बचाव करताना शरीर आणि मनाला जेव्हा थकवा येतो, तेव्हा अशी स्थिती निर्माण होते. हा थकवा निर्माण होण्यास अनेक कारणे आहेत. वर्षभरापासून मनात बसलेली भीती, संभ्रम आणि प्रत्येकवेळी सजग राहण्याच्या वृत्तीने तयार झाली आहे. प्रत्यक्षात महासाथीने तयार झालेला थकवा जाणून घेणे गरजेचे आहे. कारण अजूनही आपले करोनाशी युद्ध सुरू आहे. संकट अजूनही टळलेले नाही.
सध्या लोकांना आपली संपूर्ण ऊर्जा पणाला लावत गाइडलाइनचे पालन करणे गरजेचे आहे. जागतिक संकटातून आपल्याला पुढे जाण्यासाठी या थकव्याला आपल्या सकारात्मक आणि मनाच्या ऊर्जेने मात करायची आहे. करोनाच्या नव्या स्ट्रेनची भयावह स्थिती असताना या थकव्याचा अनुभव प्रत्येकाचा वेगळा आहे. वय, स्त्री-पुरुष, एवढेच नाही तर जबाबदारीनुसार हा थकवा वेगवेगळा परिणाम करत आहे.
अस्वस्थता, चिडचिडेपणा, निराशाजनक विचार आणि कामावर लक्ष कमी होणे यासारख्या उद्भवणाऱ्या तक्रारी सर्वसामान्य आहेत. पण आपले मित्र, सहकारी, समवयस्क मंडळींपासून दूर होऊन युवक आणि मुलांना एकटेपणा जाणवत आहे तर वरिष्ठ मंडळी देखील सामाजिक संबंध कमी होणे, भेटीगाठी कमी राहात असल्याने नैराश्य आणि व्यग्रतेला बळी पडत आहेत. अशावेळी ही परिस्थिती मुले आणि ज्येष्ठ या दोघांच्या मनाला थकवा आणणारी आहे.
त्याचबरोबर नोकरदार वर्ग हा आपल्या नोकरीबाबतची अनिश्चितता आणि काळजीने त्रस्त आहे. दुसरीकडे गृहिणीवर दैंनदिन कामाचे ओझे वाढल्याने त्यांचे मनही थकत चालले आहे. अशावेळी महासाथीमुळे निर्माण झालेला थकवा हा आपल्या जीवनावर कसा परिणाम करत आहे, हे जाणून घ्यायला पाहिजे. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी आणि जीवनाला गती देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. एकटेपणा, नैराश्य यापासून स्वत:चा बचाव करत आपल्या ऊर्जेला योग्य दिशा देणे गरजेचे आहे.
गेल्यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोपिय क्षेत्राच्या संचालकांनी युरोपीय देशांना महासाथीमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य थकव्याचा इशारा दिला होता. काही वेळा हे प्रमाण 60 टक्क्यांपेक्षा वाढू शकते, असा अंदाज वर्तविला होता. एका सर्वेक्षणानुसार कॅनडातील 31 टक्के लोकांनी करोना आणि लॉकडाऊनमुळे थकल्याचे मान्य केले. तर दुसरीकडे 28 टक्के लोकांनी स्वत: भीतीला बळी पडलेलो असल्याचे सांगतले. या थकव्यामुळेच संपूर्ण जगात जेव्हा लॉकडाऊन काढण्यात आला, तेव्हा मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले.
भारतात देखील तेच घडले. त्यामुळे आता या चुकीतून शिकून आपल्याला संसर्गाला अधिक सजगतेने हाताळावे लागणार आहे. कोविडचा सामना करताना सोशल आयसोलेशनमुळे कोणी ना कोणी काही प्रमाणापर्यंत भरकटलेपणा, वेगळेपणा किंवा अनिश्चितेपणाचा अनुभव घेतला. काही जण संसर्गातून बरे झाल्यानंतरही अनेक समस्यांना शरण गेले. अनेक कुटुंबांनी आपल्या जवळचे नातेवाईक गमावले. त्याचबरोबर शिक्षण, रोजगार, दीनचर्या यातील बदलामुळे अनेक गोष्टींपासून दूर गेलो आहेत. जीवन जगण्याची रितच बदलली आहे. तज्ज्ञांच्या मते, करोना संकटामुळे लोक फोमो (फियर ऑफ मिसिंग आउट) च्या भावनेचा सामना करत आहेत.
सध्याच्या काळात बऱ्याच गोष्टी आपल्या हातून निसटून जात आहेत. परंतु आयुष्य सहजपणाने घेतले तर काहीच गमावलेले नाही, असे समजायला हवे. भविष्यात चांगल्या गोष्टींची अपेक्षा आणि आशा नेहमीच असते. अडचणीच्या काळात एकमेकांना मदत करणे आणि मानसिक आधार देणे गरजेचे आहे. या कारणामुळेच सध्याच्या सुस्तपणाला आणि थांबलेल्या दिनमानात सकारात्मक राहून चांगल्या दिवसाची वाट पाहण्याचा विचार करणे उपयुक्त राहू शक.
सध्या आपण विरोधाभास असलेल्या स्थितीत जगत आहोत. सध्या काहीच हालचाल करता येत नाही, तरीही ऊर्जा जात आहे. आयुष्य थांबल्यासारखे वाटते, परंतु जबाबदारीमुळे धावपळ सुरूच आहे. भेटीगाठी बंद आहेत. परंतु मदत करणे आणि एकत्र राहण्याची इच्छा कमी झालेली नाही. अशावेळी संकटकाळात सकारात्मक आणि आशेने वाटचाल करणे हाच एकमेव पर्याय आहे आणि तोच आरोग्यदायी जीवन जगण्याचा अचूक मार्ग.
डॉ. प्राजक्ता पाटील